जिल्ह्यात वाढते वसाहतीकरण आणि औद्योगिकरण , यासाठी होत असलेली जंगलतोड आणि मानवनिर्मित वणव्यांमुळे वनांचा र्हास होत असल्याने पक्षांचा अधिवास नष्ट होत आहे. त्यामुळे पक्षांचे अस्तित्वच नष्ट होण्याची शक्यता आहे. पक्षांचे अस्तित्व टिकवण्यासाठी अनेक पक्षी प्रेमी व पर्यावरण प्रेमी नागरिक मानवी वस्तीत येणार्या पक्षांची दाण्यापाण्याची व्यवस्था करत आहेत. एप्रिल ते जून हा काही पक्षांचा विणीचा हंगाम असल्याने काही जणांनी तर या पक्षांसाठी घरटी देखील बांधली आहेत.
इमारती, घरा, फ्लॅटच्या गॅलरी, लोखंडी पाईप, खिडक्या, पडक्या इमारती व पार्किंग अशा मिळेल त्या ठिकाणी पक्षी घरटे बांधून आपले अस्तित्व टिकविण्यासाठी झगडताना दिसत आहेत. त्यामुळे येथे त्यांना सुरक्षित निवार्याची व्यवस्था केली जात आहे. विळे येथील पक्षी अभ्यासक राम मुंढे यांची छोटी मुलगी काही दिवसांपूर्वी घराच्या गॅलरीमध्ये उभी होती. तिला चिमणी, दयाळ आणि साळुंख्या घराबाहेर आणि गॅलरीमध्ये फिरताना दिसल्या. पक्षांच्या विणीचा हंगाम सुरू होत आहे म्हणून ते घरटे बांधण्यासाठी सुरक्षित जागा शोधत होत्या हे मुंढे यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी या पक्षांना राहण्यासाठी सुरक्षित घरटे बनविण्याचे ठरविले. ही घरटी बनवण्यासाठी टाकाऊ वस्तूंचा उपयोग करण्याचे ठरवले. त्यांनी मित्र निलेश लाड यांचे मेडिकलच्या दुकान गाठले व त्यांना घरट्याची कल्पना दिली.
लाड यांनी भरलेल्या बरण्या रिकाम्या करून घरट्यासाठी दिल्या. मुंढे यांनी या प्लॅस्टिक बरण्यांना नारळाच्या टाकाऊ साली फेविकॉलच्या आधारे चिटकल्या. तसेच कचर्यात टाकून दिलेल्या झाडूचे गवत व काड्यांपासून सुशोभित केले आणि पूर्णतः टाकाऊ वस्तू पासून उत्तम अशी घरटी तयार केली. किमान पाच ते सहा घरटी आणखी बनवून गॅलरी आणि फ्लॅट च्या सर्व खिडक्यांच्या कोपर्यात त्यांनी लावली. हे पाहून इतरही अनेकांनी हा उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे. रोहा तालुक्यातील वांगणी गावात संकल्प मित्रमंडळ व उत्कर्ष मित्रमंडळ ही दोन मंडळे व तेथील तरुण मागील काही वर्षांपासून उन्हाळ्यात पशु-पक्षांसाठी पाण्याची व्यवस्था करतात. येथील भिसे खिंड येथे उन्हाळ्यात ठिकठिकाणी रोज २४ तास पिण्याचे पाणी ठेवले जाते. सर्व जलसाठे कोरडे पडल्यावर पशु-पक्ष्यांना हे पिण्याचे पाणी संजीवनी ठरते.
जांभूळपाडा येथील पशुपक्षी प्रेमी सचिन मजेठिया हे गेली अनेक वर्षे मोकाट जनावरे व पक्षांसाठी अन्नपाण्याची व्यवस्था करत आहेत. त्यासाठी दुकानाबाहेर छोटा हौद बनवून घेतला आहे. चिमणी, कावळे व इतर अनेक पक्षी त्यांच्या दुकानासमोर दाण्यापाण्यासाठी येतात. पाणी पितात व तेथे पाण्यात छान डुंबतात. अनेक कावळे तर त्यांच्या अंगाखांद्यावर खेळतात. पक्षांसाठी थंडगार पाणी मिळावे म्हणून अनेकजण चक्क मातीची भांडी बनवून घेऊन ते परसात व झाडांवर लावतात. पालीतील डॉ. राऊत, पुई-सिद्धेश्वर येथील तरुण गणेश शिंदे व फणसवाडी येथील तरुण निलेश शिंगरे हे मागील वर्षीपासून हा अनोखा उपक्रम राबवित आहेत. तसेच ग्रीन टच नर्सरीचे चालक अमित निंबाळकर यांनी देखील आपल्या नर्सरीमध्ये व घराजवळ झाडांवर पक्षांसाठी घरटी बनवली आहेत. व त्यांना पाण्याची व्यवस्था देखील केली आहे. अशा प्रकारे जिल्ह्यात अनेक लोक उन्हाळ्यात पक्षांसाठी भूतदया दाखवीत आहेत.
विणीच्या हंगामात पक्षी घरटी बांधण्यासाठी मनुष्य वस्तीचा शोध घेत असतात. अशा पक्षांना हक्काचे आणि सुरक्षित घर मिळावे म्हणून ही सर्व धडपड चालू आहे. तयार झालेले पर्यावरण स्नेही घरटी पाहून अनेक निसर्गप्रेमी लोक सुद्धा ती बनविण्यासाठी पुढाकार घेत आहेत.
– राम मुंढे, पक्षी अभ्यासक, विळे