अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात आलेल्या पूरामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. महाडमधील पूरग्रस्त व दरडग्रस्त भागातील नागरिकांना अनेक ठिकाणांहून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. महाड, चिपळूण तसेच कोकणातील काही भागांसह सांगली, सातारा, कोल्हापूर या ठिकाणी पुरामुळे भयंकर नुकसान झाले आहे. पूरग्रस्तांना मदतीचे आवाहन करण्याच्या सूचनाही व्हाट्स ऍप, फेसबुक, ट्विटरच्या माध्यमातून येऊ लागल्या आहेत. नैसर्गिक आपत्तीच्या काळात अशा आवाहनांचे सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणात पेव फुटते ज्यामध्ये आर्थिक मदतीचे आवाहन करून खाली बँक अकाउंट क्रमांक देऊन या खात्यावर आपत्तीपीडित लोकांसाठी आर्थिक साहाय्य करण्याचे आवाहन केले जाते. यातील अनेक आवाहने ही खोटी असल्याचे आणि पुरग्रस्तांना मदतीच्या नावावर ठगांनी पैसे लुबाडल्याचे याआधीही उघड झाले आहे. लोकांच्या भावनाशीलतेचा गैरफायदा घेऊन आपली पोटे भरण्याच्या दृष्टीने तयार करण्यात आलेले हे संदेश फॉरवर्ड करून आपणही त्यांच्या पापात अप्रत्यक्ष सहभागी होतो. त्यामुळे मदतीचे आवाहन करणारे संदेश फॉरवर्ड करण्यापूर्वी त्यांची सत्यता पडताळणेही आवश्यक आहे. दोन वर्षांपूर्वी कोल्हापूर येथे आलेल्या पुराच्या वेळी राज्यातील नागरिकांनी मदतकार्यासाठी जी तत्परता दाखवली ती यंदाही दिसू लागली आहे. राजकीय पक्षांसह अनेक सामाजिक संघटना, सेवाभावी, धार्मिक संस्था, मंडळे यांनी पुढाकार घेऊन नागरिकांकडून जीवनावश्यक वस्तूंचे तसेच आर्थिक स्वरूपातील मदतीचे संकलन करून ते पूरग्रस्त भागांत पोहोचवण्यास सुरुवात केली आहे.
महाडकरांसाठी भाजपच्यावतीने मदतीचा हात
महाड पूरग्रस्तांना पनवेल महापालिकेने दिला मदतीचा हात
महाड शहर परिसरामध्ये २२ जुलैला जोरदार अतिवृष्टी होऊन पूर परिस्थिती निर्माण झाली. अनेकांचे संसार वाहून गेले, अनेकांची दुकाने उध्वस्त झाली, पूरग्रस्तांना जीवनाश्यक मदतीसाठी सर्वत्र आवाहन होत आहे. या संकटकाळत महाडमधील पूरग्रस्तांना पनवेल महानगरपालिकेने मदतीचा हात देऊ केला आहे. आयुक्त श्री. गणेश देशमुख यांच्या निर्देशानूसार घनकचरा व आरोग्य विभाग, अग्निशमन विभाग, वाहन विभाग यांच्यावतीने तातडीने मदत पोहचविण्यात आली.घनकचरा व आरोग्य विभागातर्फे चालकासहित दोन जेसीबी, दोन पाण्याचे टँकर, तीन टन कचरा उचलू शकणारे चार टिपर, दोन फॉगींग मशिन्स, फवारणीसाठी ५०० किलो जंतूनाशक केमिकल्स, याचबरोबर १ पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ५० स्वच्छता कर्मचारी व ५ पर्यवेक्षक यांचे विशेष पथक पाठविण्यात आले आहेत. तसेच १० हजार पाण्याच्या बाटल्या, ६ हजार बिस्कीट पुडे पाठविण्यात आले आहे आहेत. अग्निशमन विभागातर्फे एक फायर फायटर गाडी चार कर्मचाऱ्यांसहित तातडीने महाडला पाठविण्यात आले आहेत.
रसायनीकर पूरग्रस्तांच्या मदतीला धावले
असून माजी सरपंच संदिप सुदाम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली रसायनी पाताळगंगा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने महाड तालुक्यातील पुरग्रस्तबाधित भागाला जाऊन जिवनावश्यक वस्तूंची मदत करण्यात आली. मुसळधार पावसाने तयार झालेल्या महापुराच्या स्थितीत अनेक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत,तर लाखो लोक बेघर झाले आहेत.संकटग्रस्ताला मदतीचा हात द्यावा या भावनेतून माजी सरपंच संदिप सुदाम मुंढे यांनी रसायनी पाताळगंगा परिसरातील कार्यकर्त्यांसह महाड तालुक्यातील पुरग्रस्त वडवली बौध्दवाडी, अरविंद नगर शिरगाव,आकले व भोर या पुरग्रस्त भागात जाऊन जिवनावश्यक वस्तूंचा मोठा साठा वाटप केला.यात पुरग्रस्तांना तांदूळ,डाळी,पीठ,मसाले,चहापावडर,साखर, बिस्किटे,साबण,टुथपेस्ट, मेणबत्ती,बेसिक औषधे,बेडसिट,ब्लॅकेंट,तेलाचे पॅकेट,फिनाॅल बाॅटल,पाणी बाॅटल,कपड्यांचा व अंगाच्या साबण,खोबरेलतेल ,माचिस आदी जिवनावश्यक साहित्य पुरग्रस्तठिकाणी जावून वाटप करुन माजी सरपंच संदिप सुदाम मुंढे यांनी पूरग्रस्त भागातील कुटूंबियांना धीर देवून त्यांचे दुःख हलके करण्याचा प्रयत्न केला.
रोटरी क्लब रोहा सेंट्रल यांचा महाडकरांसाठी एक हात मदतीचा
महाड शहरात पूरस्थिती निर्माण झाली. लोकांच्या घरात होत नव्हतं ते सर्व पाण्यात वाहून गेले आणि अतिशय बिकट परिस्थिती निर्माण झाली. ‘एक हात मदतीचा’ अंतर्गत रोटरी क्लब रोहा सेंट्रल कडून सामाजिक बांधिलकी चे भान ठेवून महाड शहरामधील नदी काठावरील कुंभार आळी, गवळी आळी, तांबट आळी, विरेश्वर मंदिर परिसर, काकरतळे या भागामध्ये 3५०० पाणी बॉटल्स (१लिटर) ५००० बिस्किटे ५०० किलो फरसाण वाटप करण्यात आहे. या मदतीबद्दल नागरिकांनी भरभरून कौतुक केले. या कार्यक्रमासाठी रोटरी क्लब अध्यक्ष डॉ कैलास जैन यांच्यासह अनेक सहकारी उपस्थित होते.
शिवसेना,युवासेने शाखा नागोठणेतर्फे मदतीचा हात
ढगफुटीने गेले काही दिवस महाड, पोलादपूर शहराला वेठीस धरले होते.पूरग्रस्त कुटुंबीयांना साह्य करण्यात खारीचा वाटा उचलत शिवसेना,युवासेने शाखा नागोठणे तर्फे आज पिण्याचे पाणी,अन्नधान्य,ब्लँकेट अशा प्रकारची मदतसामुग्री रवाना करण्यात आली. आज महाड,पोलादपूर दिशेने मदत रवाना झाली आहे.रस्ते मोकळे झाल्यानंतर इतर भागातही मदत पोहोचवली जाईल असे आश्वासन विद्यमान रायगड जिल्हा परिषद सदस्य किशोरभाई जैन यांनी यावेळी दिले.तसेच यावेळी अन्नधान्य घेऊन जाणाऱ्या गाड्यांना फ्लॅग ऑफ करत सर्वांना सुरक्षित ठेवण्याची प्रार्थना केली.
हेही वाचा – …आणि तळीयेवासियांनी जड अंतःकरणाने ढिगाऱ्याखाली दबलेल्या नातेवाईकांवर अंत्यसंस्कार करण्याचा घेतला निर्णय