कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतात सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले होते. आता काही राज्यांत लॉकडाऊनच्या नियमांत शिथिलता आणण्यात आली असली तरी भारतीय क्रिकेटपटूंना एकत्र येऊन सराव करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. शार्दूल ठाकूर, चेतेश्वर पुजारा, रोहित शर्मा, मोहम्मद शमी यांच्यासह भारताचे काही क्रिकेटपटू त्यांच्या जवळच्या मैदानात जाऊन थोडाफार सराव करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, त्यांना सामना खेळण्याइतपत फिट होण्यासाठी काही आठवडे लागतील असे भारताचा माजी अष्टपैलू इरफान पठाणला वाटते. तसेच क्रिकेट पुन्हा सुरु झाल्यावर वेगवान गोलंदाजांनी सर्वाधिक काळजी घेण्याची गरज आहे, असेही पठाण म्हणाला.
वेगवान गोलंदाजी खूपच अवघड
अगदी खरे सांगायचे तर, मला वेगवान गोलंदाजांची थोडी चिंता होत आहे. त्यांना पूर्णपणे फिट होण्यासाठी साधारण चार ते सहा आठवडे लागण्याची शक्यता आहे. २५ यार्ड धावत येऊन सतत १४०-१५० प्रति किमीच्या वेगाने चेंडू टाकणे सोपे नाही. तुम्हाला हे एका चेंडूसाठी नाही, तर सलग काही षटकांसाठी करावे लागते. वेगवान गोलंदाजी करणे हे खूपच अवघड काम आहे, असे पठाण म्हणाला.