भारत आणि पाकिस्तान हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी संघ! या दोन देशांतील राजकीय तणावामुळे आता त्यांच्यात फारसे सामने होत नाहीत. परंतु, या दोन देशांतील सामने हे केवळ चाहत्यांसाठीच नाहीत, तर खेळाडूंसाठीही खूप खास असतात. दोन्ही संघांच्या प्रत्येक खेळाडूचे या सामन्यांमध्ये आपली सर्वोत्तम कामगिरी करण्याचे लक्ष्य असते. पाकिस्तानचा महान वेगवान गोलंदाज वसिम अक्रम नेहमीच भारताविरुद्ध खेळण्यास उत्सुक असायचा. त्याने भारताविरुद्ध १२ कसोटीत ४५ गडी बाद केले होते. त्याच्यासाठी १९९९ मध्ये झालेला भारत दौरा खूप खास होता.
१९९९ सालच्या भारत दौर्यात मी पाकिस्तानचे नेतृत्व करत होतो आणि आम्ही तब्बल १० वर्षांनंतर भारताविरुद्ध कसोटी क्रिकेट खेळत होतो. कसोटी मालिकेचा पहिला सामना चेन्नईत झाला. त्यावेळी मी आमच्या संघाला म्हणालो की, जर स्टेडियममधील प्रेक्षक शांत असतील, तर आपण चांगली कामगिरी करत आहोत असे समजा. आम्ही तो सामना जिंकला आणि भारत-पाक लढतींच्या इतिहासात पहिल्यांदा चेन्नईतील प्रेक्षकांनी आमच्यासाठी उभे राहून टाळ्या वाजवल्या. हे कोणालाही अपेक्षित नव्हते.
आमच्यासाठी तो दौरा खूपच खास होता, असे अक्रमने सांगितले. तुम्ही भारताविरुद्ध चांगली कामगिरी केल्यावर पाकिस्तानमध्ये तुमची वेगळी ओळख निर्माण होते. हेच भारतातही घडत असेल. ९० च्या दशकात आम्ही भारताविरुद्ध बरेच सामने जिंकले. परंतु, आता यात बदल झाला असून सध्या भारत वरचढ ठरत आहे, असेही अक्रम म्हणाला.