भारतीय संघाने २०११ एकदिवसीय वर्ल्डकपचे जेतेपद पटकावले होते. २ एप्रिल २०११ रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेला ६ विकेट राखून पराभूत केले. या विजयाला आज १० वर्षे पूर्ण झाली. मागील वर्षी साधारण याच दिवशी या विजयात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या गौतम गंभीरने एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीत त्याने या विश्वविजेत्या संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला टोला लगावला होता. धोनीने अंतिम सामन्यात नाबाद ९१ धावांची खेळी केली होती. तसेच भारताला जिंकण्यासाठी ४ धावांची आवश्यकता असताना धोनीने षटकार मारला. हा षटकार आजही चाहत्यांना लक्षात आहे. मात्र, या एका षटकाराने किंवा एकट्या खेळाडूने भारताला वर्ल्डकप जिंकवला नव्हता, असे म्हणत गंभीरने धोनीवर निशाणा साधला होता.
एका षटकाराला इतके महत्व का?
केवळ एका खेळाडूने आम्हाला वर्ल्डकप जिंकवून दिला असे तुम्हाला वाटते का? केवळ एकट्या खेळाडूच्या चांगल्या कामगिरीमुळे वर्ल्डकप जिंकता येत असता, तर भारताने आतापर्यंतचे सर्वच वर्ल्डकप जिंकले असते. वर्ल्डकपसारखी स्पर्धा जिंकण्यासाठी सर्व खेळाडूंचे योगदान महत्वाचे असते. तुम्ही झहीर खानची गोलंदाजी विसरलात का? त्याने अंतिम सामन्यात सलग तीन निर्धाव षटके टाकली. तसेच युवराज सिंग आणि सचिन तेंडुलकर यांच्या कामगिरीकडे दुर्लक्ष करता येऊ शकते का? मग असे असतानाही आपण एका षटकाराला इतके महत्व का देतो? असा सवाल गंभीरने त्या मुलाखतीत उपस्थित केला होता.
धोनी, गंभीरची दमदार कामगिरी
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ६ बाद २७४ अशी धावसंख्या उभारली. याचा पाठलाग करताना भारताची ३ बाद ११४ अशी अवस्था होती. मात्र, कर्णधार महेंद्रसिंग धोनी (नाबाद ९१) आणि गौतम गंभीर (९७) यांनी अप्रतिम फलंदाजी करत भारताचा डाव सावरला. त्यानंतर धोनीने युवराज सिंगच्या (नाबाद २१) साथीने अर्धशतकी भागीदारी करत भारताला विजय मिळवून दिला.