भारताचा युवा यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंतची इंडियन प्रीमियर लीग (IPL) संघ दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदी निवड झाली आहे. आयपीएलच्या यंदाच्या मोसमाला ९ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. दिल्लीला यंदा ही स्पर्धा जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. दिल्लीने मागील वर्षी आयपीएलची अंतिम फेरी गाठली होती. मात्र, यंदाची स्पर्धा सुरु होण्याआधीच त्यांना मोठा धक्का बसला. त्यांचा नियमित कर्णधार श्रेयस अय्यरच्या खांद्याला दुखापत झाली. नुकतीच भारत-इंग्लंड एकदिवसीय मालिका झाली आणि या मालिकेच्या पहिल्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना अय्यरचा खांदा दुखावला. त्यामुळे तो आयपीएलच्या यंदाच्या मोसमाला मुकणार असून त्याच्या अनुपस्थितीत पंत आता दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करेल. दिल्लीच्या कर्णधारपदी निवड झाल्याने माझे स्वप्न पूर्ण झाले आहे, असे पंत म्हणाला.
A dream come true moment for @RishabhPant17 🥺
Ready to roar with you in #IPL2021, Captain Pantastic 💙#YehHaiNayiDilli pic.twitter.com/nuwF3E0mUV
— Delhi Capitals (@DelhiCapitals) March 30, 2021
सर्वोत्तम कामगिरी करण्यास उत्सुक
दिल्लीत मी लहानाचा मोठा झालो आणि माझा आयपीएल स्पर्धेतील प्रवासही सहा वर्षांपूर्वी दिल्लीपासून सुरु झाला. या संघाचे नेतृत्व करणे हे माझे स्वप्न होते आणि आज हे स्वप्न पूर्ण झाले आहे. दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करण्याची माझ्यात क्षमता आहे असे वाटल्याबद्दल मी संघमालकांचे आभार मानतो, असे पंत म्हणाला. मी कर्णधार म्हणून सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी उत्सुक असल्याचेही पंतने सांगितले.
पहिल्यांदाच कर्णधारपद भूषवण्याची संधी
पंत सध्या चांगल्या फॉर्मात असून त्याने नुकत्याच झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी, टी-२० आणि एकदिवसीय मालिकांमध्ये दमदार कामगिरी केली. तसेच त्याने दिल्लीसाठी आयपीएलमध्ये आतापर्यंत ६८ सामने खेळले असून त्यात १५१.९७ च्या स्ट्राईक रेटने २०७९ धावा केल्या आहेत. आता त्याला आयपीएलमध्ये पहिल्यांदाच दिल्लीचे कर्णधारपद भूषवण्याची संधी मिळणार आहे.