Wednesday, March 19, 2025
27 C
Mumbai
Homeक्रीडाRanji Trophy Final : 2215 दिवसांनंतर रणजी ट्रॉफी पुन्हा विदर्भाकडे

Ranji Trophy Final : 2215 दिवसांनंतर रणजी ट्रॉफी पुन्हा विदर्भाकडे

Subscribe

यजमान विदर्भाने केरळचा पहिल्या डावातील 37 धावांच्या आघाडीच्या जोरावर पराभव करून रणजी ट्रॉफी हस्तगत केली ती 2215 दिवसांनी. रणजी स्पर्धेतील विदर्भाचे हे तिसरे जेतेपद आहे.

नागपूर : यजमान विदर्भाने केरळचा पहिल्या डावातील 37 धावांच्या आघाडीच्या जोरावर पराभव करून रणजी ट्रॉफी हस्तगत केली ती 2215 दिवसांनी. रणजी स्पर्धेतील विदर्भाचे हे तिसरे जेतेपद आहे. 2017-18, 2018-19 नंतर राष्ट्रीय स्पर्धेत विदर्भाने पुन्हा एकदा ट्रॉफी पटकावली. पाचव्या आणि अखेरच्या दिवशी उपाहारानंतर विदर्भाने दुसरा डाव 9 बाद 375 धावांवर सोडला. नलकांडेने अर्धशतक साजरे केल्यावर कर्णधार अक्षय वाडकरने डाव सोडला आणि सामना तिथेच थांबवण्यात आला. सामना अनिर्णीत राहिल्यामुळे विदर्भ संघ अजिंक्य ठरला. यंदाच्या हंगामात विदर्भ संघ 10 सामन्यात अपराजित राहिला आहे. (After 2215 days Vidarbha wins the Ranji Trophy again)

जामठा स्टेडियमवर आज (2 मार्च) सुमारे दीड हजार वैदर्भीय दर्दी क्रिकेटरसिकांनी हजेरी लावली होती. पहिल्या डावात 37 धावांची आघाडी घेतल्यामुळे यजमान संघाचे जेतेपद जवळजवळ निश्चित झाले होते. शतकवीर करूण नायर 3 धावांची भर घालून बाद झाला. त्याने यंदाच्या हंगामात 863 धावा तडकावल्या. त्यात 4 शतके आणि 2 अर्धशतकांचा समावेश आहे. करुणच्या छायेत खेळताना दानिश मालेवारची फलंदाजीही बहरली.

आदित्य सरवटेने नायरला यष्टीरक्षक अझरकरवी झेलबाद केले. इतर फलंदाजांनी पण किल्ला लढवत डाव लांबवला आणि चहापानाआधी दर्शन नलकांडेने अर्धशतक झळकावल्यावर खेळ थांबवण्यात आला. आदित्य सरवटेने 4 मोहरे टिपले. हर्ष दुबेला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचे अडीच लाखांचे बक्षीस देऊन बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

धावफलक : 379 आणि 9 बाद 375 (करूण नायर 135, दानिश मालेवार 73, दर्शन नलकांडे नाबाद 51, आदित्य सरवटे 96 धावात 4 बळी) अनिवि. केरळ 342

स्पर्धेत सर्वोत्तम : हर्ष दुबे, सामन्यात सर्वोत्तम : दानिश मालेवार


Edited By Rohit Patil