Anurag Thakur : भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) संघ आशिया चषक स्पर्धेत दोन वेळा आमनेसामने आले. याशिवया हे दोन्ही पुढील महिन्यात एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत पुन्हा समोरासमोर येणार आहेत. मात्र काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत एक कर्नल, एक मेजर आणि पोलीस उपअधीक्षक शहीद झाल्यानंतर पाकिस्तानसोबत क्रिकेट सामने नकोच, अशी मागणी जोर धरू लागली होती. या मागणीदरम्यान भारताचे क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी मोठे वक्तव्य केले आहे. (Anurag Thakur India vs Pakistan match Important Statement by Sports Minister)
हेही वाचा – 39 वर्षांची प्रतीक्षा कायम, भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा फायनल नाही; शोएब अख्तर म्हणाला…
भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ केवळ आयसीसी आणि आशिया चषक स्पर्धांमध्येच आमनेसामने येतात. या दोन्ही संघामध्ये 2013 रोजी शेवटची द्विपक्षीय मालिका खेळवली गेली होती. असे असले तरी दोन्ही संघामध्ये क्रिकेट पूर्ववत व्हावे यासाठी पाकिस्तानकडून प्रयत्न होताना दिसत असले तरी भारत आणि पाकिस्तान सीमेवर दहशतवादी हल्ले काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाही आहेत. त्यामुळे सीमेपलीकडील दहशतवाद संपेपर्यंत पाकिस्तानशी द्विपक्षीय क्रिकेट संबंध पूर्ववत होणार नाहीत, असे अनुराग ठाकूर यांचे म्हणणे आहे.
अनुराग ठाकूर म्हणाले की, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) यासंदर्भात फार पूर्वीच निर्णय घेतला होता. बीसीसीआयने ठरवले आहे की, पाकिस्तानने घुसखोरी आणि सीमापार दहशतवाद थांबवल्याशिवाय द्विपक्षीय सामने होणार नाहीत. या देशातील प्रत्येक सामान्य नागरिकाची ही भावना आहे असे मला वाटते, असेही अनुराग ठाकूर म्हणाले.
हेही वाचा – IND vs BAN : शाकीब अल हसनने सावरले; बांग्लादेशचे भारतासमोर 266 धावांचे आव्हान
बीसीसीआयच्या भूमिकेमुळे आशिया चषक हायब्रीड मॉडेलनुसार
आशिया चषक 2023 स्पर्धा पाकिस्तानमध्ये होणार होती, परंतु भारत सरकारच्या परवानगीअभावी ते आपला संघ पाकिस्तानात पाठवू शकत नाहीत, असे बीसीसीआयने स्पष्ट केले होते. यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पुढील महिन्यात भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेवर बहिष्कार घालण्याची धमकी दिली होती. मात्र, आशियाई क्रिकेट परिषदेने संकरित मॉडेल स्वीकारले आणि श्रीलंकेला सह-यजमान बनवण्यात आले. त्यामुळे हायब्रीड मॉडेलनुसार पाकिस्तानमध्ये चार सामने आयोजित करण्यात आले होते, तर अंतिम सामन्यासह श्रीलंकेत 9 सामने आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.