रविचंद्रन अश्विनने केलेल्या शतकामुळे भारताने दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडपुढे ४८२ धावांचे लक्ष्य ठेवले. या सामन्यात भारताने पहिल्या डावात ३२९ धावांची मजल मारली होती. याचे उत्तर देताना इंग्लंडला १३४ धावाच करता आल्याने भारताला पहिल्या डावात १९५ धावांची आघाडी मिळाली होती. यानंतर भारताने दुसऱ्या डावात अप्रतिम फलंदाजी करत २८६ धावा केल्या. त्यामुळे इंग्लंडला सामना जिंकण्यासाठी ४७६ धावांचे आव्हान मिळाले. भारताच्या दुसऱ्या डावात अश्विनने १४८ चेंडूत १४ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने १०६ धावांची खेळी केली. हे अश्विनचे कसोटी क्रिकेटमधील पाचवे शतक ठरले.
Innings Break!
An exceptional batting performance from @ashwinravi99 (106) guides #TeamIndia to 286 in the 2nd innings.
Scorecard – https://t.co/Hr7Zk2BVcc #INDvENG @Paytm pic.twitter.com/1y16Nttsbu
— BCCI (@BCCI) February 15, 2021
अश्विन-कोहलीची ९६ धावांची भागीदारी
भारताने तिसऱ्या दिवशी १ बाद ५४ वरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. भारताने पहिल्याच सत्रात ५ विकेट गमावल्या. परंतु, कर्णधार विराट कोहली आणि अश्विनने भारताचा डाव सावरला. या दोघांनी सातव्या विकेटसाठी ९६ धावांची भागीदारी रचली. अखेर मोईन अलीने कोहलीला (६२) पायचीत पकडत ही जोडी फोडली. अश्विनने मात्र चांगली फलंदाजी सुरु ठेवत १३४ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. परंतु, ऑली स्टोनने अश्विनला (१०६) बाद केल्याने भारताचा दुसरा डाव २८६ धावांवर आटोपला.