भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेला ४ मार्चपासून सुरूवात होणार आहे. मोहालीच्या पीसीए आयएएस बिंद्रा स्टेडियममध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. हा कसोटी सामना भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीसाठी १०० वा कसोटी सामना ठरणार आहे. त्याचप्रमाणे विराटचा १०० वा कसोटी सामना पाहण्यासाठी बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला असून ५० टक्के प्रेक्षकांना स्टेडियममध्ये परवानगी दिली आहे.
BCCI allows crowd at 50 per cent stadium capacity for first India-Sri Lanka Test in Mohali which would be Virat Kohli’s 100th game. #ViratKohli
— Press Trust of India (@PTI_News) March 1, 2022
मागील काही दिवसांपूर्वी भारत आणि श्रीलंकेचा पहिला सामना हा प्रेक्षकांशिवायच खेळवला जाणार असल्याचा निर्णय बीसीसीआने घेतला होता. बीसीसीआयच्या एका निर्णयामुळे या पर्वणीवर विरजण पडल्याचे समजले जात होते. मोहाली आणि आसपासच्या परिसरात कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता बीसीसीआयकडून निर्णय घेण्यात आला होता. परंतु मोहालीतील पहिल्या भारत-श्रीलंका कसोटीसाठी बीसीसीआयने स्टेडियममध्ये ५० टक्के प्रेक्षकांना परवानगी दिली असून विराटचा १०० वा कसोटी सामना चाहत्यांना पाहता येणार आहे.
भारतीय संघाचा पहिला सामना हा मोहालीत होणार आहे. तर दुसरा सामना बंगळुरू येथे खेळवला जाणार आहे. एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर हा दुसरा कसोटी सामना खेळवला जाणार आहे. १२ मार्चपासून बंगळुरूमध्ये सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटीत प्रेक्षकांना परवानगी दिली जाणार आहे. ही डे-नाईट टेस्ट असून पिंक बॉलमध्ये होणार आहे. हा सामना पाहण्यासाठी ५० टक्के प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश देण्यात येणार आहे.
विराट कोहली पहिल्यांदाच कसोटी सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळणार आहे. रोहित शर्मा आपल्या कसोटी क्रिकेटमधील १०० वा सामना खेळणार आहे. कोहलीने आतापर्यंतच्या ९९ सामन्यांमध्ये ५०.३९ च्या सरासरीने ७९६२ धावा केल्या आहेत. दरम्यान विराटने शंभराव्या कसोटीत शतक झळकवावे, अशी प्रेक्षकांची भावना आहे.
हेही वाचा : Mumbai Corona Update : दिलासादायक ! मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच मुंबईत शून्य मृत्यूची नोंद