दक्षिण आफ्रिका दौऱ्याच्या पूर्वसंध्येला भारतीय संघात मोठा बदल झाला आहे. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने (BCCI) विराट कोहलीला एकदिवसीय सामन्यांच्या कर्णधारपदावरून हटवले आणि आता टी-२० सोबतच एकदिवसीय सामन्यांच्या कर्णधारपदाची धुरा देखील रोहित शर्माकडे सोपवण्यात आली आहे. जेव्हापासून विराट कोहलीला कर्णधारपदावरून हटवण्यात आले तेव्हापासून हा मुद्दा वादाचा केंद्रबिंदू ठरला आहे. दरम्यान याबाबतीच पुन्हा एकदा माजी क्रिकेटर आणि सध्याचे बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांचे मोठे विधान समोर आले आहे. गांगुली यांनी एका मुलाखतीत या पूर्ण प्रकरणावर भाष्य केले. त्यांनी म्हंटले की, मी स्वत: विराट कोहलीला टी-२० चे कर्णधारपद न सोडण्याबाबत सांगितले होते. मात्र त्याला कामाचा जास्त ताण जाणवत असल्याने हे सोडायचे होते. ते योग्यही आहे”.
“विराट कोहली खूप चांगला क्रिकेटर आहे, त्याने मोठ्या कालावधीपासून भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवले आहे. पण व्हाइट बॉल क्रिकेटमध्ये एकच कर्णधार असायला हवा होता. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. आम्हाला पुढे काय होईल याची कल्पना नाही. मात्र आमच्याकडे एक चांगला संघ आहे, शानदार खेळाडू आहेत जे लवकरच याचा निकाल देतील” असे गांगुली यांनी आणखी म्हंटले.
BCCI ने असा घेतला मोठा निर्णय
लक्षणीय बाब म्हणजे सौरव गांगुली यांच्याकडून यापूर्वीच माहिती देण्यात आली होती की. आम्ही विराट कोहलीला टी-२० चे कर्णधारपद न सोडण्यास सांगितले होते. पण त्याने हा प्रस्ताव नाकारला. बीसीसीआयने काही दिवसांपूर्वीच जेव्हा दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली, त्यासोबतच एकदिवसीय क्रिकेटमध्ये कर्णधार बदलण्याची देखील घोषणा केली. बीसीसीआयच्या या मोठ्या निर्णयानंतर माहिती समोर आली होती की, बोर्डाने कोहलीला ४८ तासांचा अल्टीमेटम दिला होता की त्याने स्वत:च या पदावरून पायउतार व्हावे. मात्र विराट कोहलीने असे केले नाही आणि त्यानंतर बोर्डानेच रोहित शर्माला कर्णधार बनवण्याचा निर्णय घेतला आणि त्याची घोषणा केली.