भारतामध्ये १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात येत आहे. त्यामुळे भारताचे क्रिकेटपटू लसीचा पहिला डोस घेत आहेत. भारतीय कसोटी संघाचे सदस्य उपकर्णधार अजिंक्य रहाणे आणि उमेश यादव यांनी शनिवारी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. मात्र, भारतीय संघ पुढील महिन्यात इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार असल्याने त्यांना कोरोना लसीचा दुसरा डोस इंग्लंडमध्ये मिळू शकेल का? हा प्रश्न आहे. पहिल्या आणि दुसऱ्या डोसमध्ये साधारण ४० दिवसांचे अंतर गरजेचे आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेटपटूंना दुसरा डोस इंग्लंडमध्येच घ्यावा लागणार आहे. याबाबत बीसीसीआय इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डशी (ECB) चर्चा करत आहे.
येत्या काही दिवसांत निर्णय
बीसीसीआय ईसीबीशी सतत संपर्कात आहे. भारतीय क्रिकेटपटूंना कोरोना लसीचा दुसरा डोस इंग्लंडमध्ये देण्याबाबत ईसीबी सरकारशी चर्चा करणार आहे. मात्र, युके सरकारने परवानगी नाकारल्यास आम्हाला कोरोना लस भारतातून इंग्लंडमध्ये नेण्याची सोय करावी लागेल. याबाबत येत्या काही दिवसांत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे, असे बीसीसीआयचा अधिकारी म्हणाला.
१८ जूनपासून अंतिम सामना
भारतीय संघ २ जूनला इंग्लंडसाठी रवाना होणार आहे. त्याआधी त्यांना ८ दिवस भारतातच क्वारंटाईन व्हावे लागणार आहे. तसेच इंग्लंडमध्ये दाखल झाल्यावर भारताचे क्रिकेटपटू आणखी १० दिवस क्वारंटाईन होतील. मात्र, या काळात त्यांना सराव करण्याची परवानगी असणार आहे. भारत या इंग्लंड दौऱ्यात एकूण सहा कसोटी सामने खेळले. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना १८ ते २२ जून या कालावधीत खेळला जाणार आहे.