गेल्या काही दिवसांपासून फेसबुक, वॉट्सअॅप स्टेटस, ग्रुप आयकॉन, प्रसारमाध्यमं सगळीकडे एकाच नावाची चर्चा आहे. ती म्हणजे पाकिस्तानच्या ताब्यात अडकलेले भारताचे वीर पायलट अभिनंदन वर्थमान यांची. काल संपूर्ण देशाचं लक्ष त्यांच्या मायभूमीत परतण्याकडे लागलं होतं. अवघ्या ६० तासांच्या प्रतिक्षेनंतर विंग कमांडर अभिनंदन वर्थमान मायदेशी परतले. भारतात परतल्यानंतर आणि येण्या पूर्वीपासूनच संपूर्ण देशभरात उत्साहाच, आनंदाच वातावरण होतं. फटाके फोडून, केक कापून, देश भक्तीपर घोषणा देऊन या वीराचे देशभरातून स्वागत करण्यात आले. त्यातच शुक्रवारी बीसीसीआयनेदेखील त्यांना अनोखी सलामी दिली आहे.
अभिनंदन यांच्या नावाची जर्सी
विश्वचषक २०१९ च्या स्पर्धेत खेळणाऱ्या भारतीय खेळाडूंसाठी नवीन जर्सी बनवण्यात येणार असून विषेश म्हणजे या जर्सीवर विंग कमांडर अभिनंदन यांचं नाव छापण्यात आलं आहे. तसेच या जर्सीचा नंबर एक आहे. इंग्लंडमध्ये होणाऱ्या आगामी विश्वचषक स्पर्धेत भारतीय खेळाडू या जर्सी घालून खेळणार आहेत. बीसीसीआयने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ही जर्सी शुक्रवारी लॉंच करण्यात आली आहे. त्याचबरोबर ‘अभिनंदन तुझे मायदेशी स्वागत आहे. तू आकाशावर राज्य करतो. त्याचप्रमाणे तू आमच्या सर्वांच्याच हदृयावरही राज्य करतोस. तुझे धैर्य आणि शौर्य येणाऱ्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देईल’, असा अभिनंदनपर संदेश त्यांनी ट्विटरवरुन दिला आहे.
#WelcomeHomeAbhinandan You rule the skies and you rule our hearts. Your courage and dignity will inspire generations to come ?? #TeamIndia pic.twitter.com/PbG385LUsE
— BCCI (@BCCI) March 1, 2019
अनोख्या सलामीची चर्चा
सध्या सोधल मीडियावर हा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. दरम्यान, भारताचे मिग २१ विमान पाकिस्तानमध्ये कोसळल्यानंतर पाकिस्तानच्या ताब्यात अडकलेले विंग कमांडर अभिनंदन वर्थमान ६० तासांनतर भारताच्या वाघा बॉर्डरवरून मायदेशी परतले. अनेक माध्यमातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असताना बीसीसीआयने त्यांना दिलेली अनोख सलामी दखलपात्र आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.