आयपीएल स्पर्धे दरम्यान, स्पॉट फिक्सिंग प्रकरणी दोषी आढळलेला क्रिकेटपटू श्रीसंतला अखेर बीसीसीआयकडून दिलासा मिळाला आहे. आयपीएलमध्ये स्पर्धे दरम्यान २०१३ साली स्पॉट फिक्सिंगचे आरोप झाल्यानंतर बीसीसीआयने भारताचा वेगवान गोलंदाज श्रीसंतवर आजीवन बंदी घातली होती. मात्र, काही महिन्यांपूर्वी श्रीसंतवरील आजीवन बंदी उठवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला होता आणि त्याच्यावरील बंदीचा नवा कालावधी किती असावा हे ठरवण्याचा अधिकार बीसीसीआयला दिला होता. त्यानुसार आता बीसीसीआयचे लोकपाल डी.के. जैन यांनी श्रीशांतवर २०१३ पासून सात वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्याच्यावरील बंदीचा कालावधी पुढील वर्षी ऑगस्टमध्ये संपणार असून त्याला २०२० मध्ये क्रिकेटच्या मैदानावर परतता येणार आहे.
हेही वाचा – भारतीय संघावर हल्ल्याची धमकी
श्रीसंतने आपल्या उमेदीच्या काळातील बराचसा काळ मैदानाबाहेर घालवला असून जवळपास ६ वर्षांच्या बंदीची शिक्षा भोगली आहे. त्यामुळे त्याच्यावरील आजीवन बंदी उठवून त्याला ७ वर्षांच्या बंदीची शिक्षा देण्यात आली आहे. त्याच्या या बंदीचा कालावधी सप्टेंबर २०२० मध्ये पूर्ण होईल. त्यानंतर तो क्रिकेटच्या मैदानावर परतणार असल्याची माहिती लोकपाल यांनी दिली आहे.
हे होते प्रकरण
२०१३ मध्ये आयपीएल स्पॉट फिक्सिंगच्या आरोपीवरुन दिल्ली पोलिसांनी श्रीसंतला मुंबईतून अटक केली होती. फिक्सिंगच्या आरोपावरुन बीसीसीआयने श्रीसंतवर आजीवन बंदी घालण्याचा आणि १० लाख रुपये दंड ठोठावण्याचा निर्णय घेतला होता.
गुन्हा केला कबुल
‘आपल्या कुटुंबाला याप्रकरणी गोवण्याची तसेच त्यांचा छळ करण्याची मला धमकी देण्यात आली होती. त्यामुळे मी हा गुन्हा कबुल केला आहे‘, असं स्पष्टीकरण श्रीसंतने दिले आहे.
काय म्हणाला श्रीसंत
सर्वोच्च न्यायालयाने स्पॉट फिक्सिंगच्या काळात श्रीसंतची वर्तवणूक योग्य नव्हती, असा ठपका ठेवला होता. तर आपल्यावर BCCI कडून लावण्यात आलेली बंदी अत्यंत कठोर असून आपण बेकायदेशीर गोष्टींमध्ये सहभागी होतो हे सिद्ध करणारा कोणताही पुरावा नव्हता, असे श्रीसंतकडून न्यायाधीश अशोक भूषण आणि के एम जोसेफ यांच्या खंडपीठासमोर सांगण्यात आले होते. त्याचप्रमाणे कोणत्याही क्रिकेटपटूला इतकी कठोर शिक्षा झाली नसल्याचे सांगत माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनचे उदाहरणही श्रीसंतने दिले होते. जर अझरुद्दीनला पुन्हा संधी मिळू शकते तर श्रीसंतला का नाही? असा सवाल श्रीसंतच्या वकिलांनी उपस्थित केला होता. त्यानंतर अखेर श्रीसंतला हा दिलासा देण्यात आला.
हेही वाचा – मनीष, अय्यरची कर्णधारपदी निवड