नुकतीच इंग्लंडमध्ये झालेली पहिलीवहिली दिव्यांग क्रिकेटपटूंची टी-२० जागतिक अजिंक्यपद स्पर्धा भारताने जिंकली. या स्पर्धेत भारताचे नेतृत्व करणार्या विक्रांत केणीचे पालघरमध्ये जंगी स्वागत करण्यात आले. विक्रांत पालघर जिल्ह्यातील तारापूरजवळील कंबोडे गावातील मच्छीमार कुटुंबातील आहे.
तारापूर-बोईसर औद्यौगिक क्षेत्रातील डी’डेकोर होम्स फेब्रिक्स या कंपनीत नोकरी करणारा विक्रांत कंपनीकडून दिव्यांग क्रिकेटमध्ये खेळतो. भारताला विजय मिळवून देणारा विक्रांत आमचा सहकारी असल्याचा आम्हाला अभिमान वाटतो, असे कंपनीचे महाव्यवस्थापक शिरीष नाडकर्णी यांनी सांगितले.
यावेळी विक्रंत केणीने सांगितले, मला भारताचे नाव जगाच्या पाठीवर जावे असे वाटते. मी दिव्यांग जरी असलो तरी स्वतःला सर्वसामान्य म्हणूनच पाहतो. कंपनीसह पालघर जिल्ह्यात माझे सर्वत्र स्वागत असल्याचा मला खूप आनंद झाला आहे. दिव्यांग असलो तरीही आपण काहीतरी चांगले करू शकतो, हा विश्वास असणे आवश्यक आहे. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा हेच मला इतरांना सांगायचे आहे.
जागतिक स्पर्धेसाठी ‘ऑल इंडिया क्रिकेट असोसिएशन फॉर फिजिकली चॅलेंज्ड’ (एआयसीएपीसी) या संस्थेने विजेत्या भारतीय संघाची निवड केली होती. या स्पर्धेत भारत, इंग्लंड, पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या संघांचा सहभाग होता. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने यजमान इंग्लंडवर ३६ धावांनी मात केला.