भारताचा कर्णधार विराट कोहली पितृत्व रजेवर गेला असल्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अखेरच्या तीन कसोटी सामन्यांना मुकणार आहे. कोहलीच्या अनुपस्थितीत मुंबईकर अजिंक्य रहाणेला भारताचे कर्णधारपद भूषवण्याची संधी मिळणार आहे. अजिंक्यने याआधी कसोटीत दोन वेळा भारताचे कर्णधारपद भूषवले असून हे दोन्ही सामने भारताने जिंकले. परंतु, हे दोन्ही सामने भारतात झाले होते. त्यामुळे शनिवारपासून सुरु होणाऱ्या बॉक्सिंग-डे कसोटीत अजिंक्य पहिल्यांदा परदेशात भारताचे नेतृत्व करणार आहे. भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व करणे ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचे सामन्याच्या पूर्वसंध्येला अजिंक्यने सांगितले.
JUST IN: India announce their playing XI for the Boxing Day Test 👀
🧢 Shubman Gill, Mohammad Siraj to debut
🏏 Ravindra Jadeja 🔙 as the all-rounder
🧤 Rishabh Pant to take the gloves pic.twitter.com/RwjDS4j1X5— ICC (@ICC) December 25, 2020
भारताचे नेतृत्व करणे ही माझ्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. तसेच माझ्यासाठी ही चांगली संधी असून माझ्यावर आता मोठी जबाबदारीही आहे. मात्र, या जबाबदारीचे माझ्यावर दडपण नाही. आता मी केवळ स्वतःच्या खेळावर नाही, तर संघाच्या कामगिरीवर लक्ष देणार आहे. मी माझ्या खेळाडूंना पाठिंबा देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन, असे रहाणे म्हणाला.
ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी त्यांच्या खेळाडूंना रहाणेवर दबाव टाकण्यास सांगितले आहे. याबाबत विचारले असता रहाणेने सांगितले, ऑस्ट्रेलियन खेळाडूंना बोलायला खूप आवडते. ते त्यांना हवे ते करू शकतात. मी त्यांना रोखणार नाही. आम्ही केवळ आमच्या खेळावर लक्ष केंद्रित करणार आहोत.