नवी दिल्ली : गेल्या काही वर्षांपूर्वी चॅम्पियन्स ट्रॉफी ही पाकिस्तानमध्ये होणार, अशी घोषणा झाली आणि भारतीय संघ स्पर्धेसाठी पाकिस्तानात जाणार नाही, अशी चर्चा सुरू झाली. त्यामुळे आयसीसी या स्पर्धेचे यजमानपद काढून घेणार की काय? असे चित्र तेव्हा निर्माण झाले होते. पण पाकिस्तानने हे यजमानपद सोडण्यास नकार दिला आणि तब्बल दोन वर्ष ही स्पर्धा पाकिस्तानमध्येच व्हावी यासाठी अनेक प्रयत्न केले. यावेळी आयसीसीने मार्ग काढत हायब्रीड मॉडेल आणले, ज्यामध्ये भारतीय संघाचे सर्व सामने हे दुबईमध्ये आयोजित करण्यात आले. पण यानंतर स्पर्धेला सुरुवात झाली आणि मायदेशात पाकिस्तानचा संघ वरचढ ठरणार, अशी चर्चा सुरू झाली. पण यजमानपद भूषविणारा पाकिस्तानचा संघ आता स्पर्धेबाहेर पडला आहे. (Champions Trophy 2025 Internal conflict between captain, coach leads to Pakistan’s exit)
हेही वाचा : India and Pakistan : काश्मीरबद्दल तर तुम्ही काही बोलूच नका, भारताने पाकिस्तानला सुनावले
कर्णधार मोहम्मद रिझवान आणि प्रशिक्षक आकिब जावेद यांच्यातील अंतर्गत कलहामुळे पाकिस्तान संघ चॅम्पियन्स ट्रॉफीमधून ग्रुप स्टेजमध्येच अभ्र पडला, असे समोर येत आहे. कर्णधाराला बदल करायचा होता, पण प्रशिक्षक सहमत नव्हता, असेदेखील समोर आलेले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, पहिल्या सामन्यात पाकिस्तानला न्यूझीलंडकडून आणि दुसऱ्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या भारतीय संघाकडून पराभव पत्करावा लागला होता. यानंतर त्याचा उपांत्य फेरीत पोहोचण्याचा मार्ग जवळजवळ बंद झाला. दुसऱ्याच दिवशी जेव्हा न्यूझीलंडने बांगलादेशला हरवले तेव्हा यजमान पाकिस्तानसाठी स्पर्धा संपल्याची अधिकृतपणे पुष्टी झाली. पाकिस्तानच्या या खराब कामगिरीमागचे कारण काय आहे? अशी चर्चा सुरू असताना संघात फूट पडल्याचे म्हटले जात आहे. कर्णधार आणि प्रशिक्षक यांचे एकमत नसल्याचे समोर आलेले आहे.
पाकिस्तानच्या एका वृत्तानुसार, पाकिस्तानची खराब कामगिरी ही संघाचा कर्णधार मोहम्मद रिझवान आणि मुख्य प्रशिक्षक आकिब जावेद यांच्यातील अंतर्गत कलाहामुळे झाली आहे. महत्त्वाच्या निर्णयांवर सल्लामसलत न झाल्यामुळे मोहम्मद रिझवान निराश असल्याचे समोर आले आहे. जेव्हा पीसीबीने खुशदिल शाहच्या समावेशाची वकिली केली तेव्हा प्रशिक्षक आकिब जावेद यांनी पुढे जाऊन फहीम अशरफची निवड केली. निवड समिती आणि मोहम्मद रिझवान स्पष्टपणे एकाच पानावर नव्हते, असे बोलले जात आहे. तसेच, पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनीही आयसीसी स्पर्धेपूर्वी संघात बदल करण्याचे दोनदा सुचवले होते. पण, त्यांच्या सल्ल्याचा विचार करण्यात आला नाही. असे असले तरी, बोर्ड प्रमुखांनी संघाच्या बाबींमध्ये हस्तक्षेप करू इच्छित नसल्यामुळे त्यावर कोणतीही कारवाई न करण्याचा निर्णय घेतला. खराब कामगिरीमुळे घरच्या मैदानावर चॅम्पियन्स ट्रॉफीचे जेतेपद राखण्याचे पाकिस्तानचे स्वप्नही भंगले.