भारताने कोलकत्ता येथे झालेल्या तिसऱ्या टी-२० मधील विजयासह न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत शानदार खेळी करून ३-० अशा फरकाने विजय मिळवला. रविवारी झालेल्या तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाने ७३ धावांनी मोठा विजय मिळवत टी-२० मालिकेवर कब्जा केला. टी-२० सामन्यांसाठी नव्याने कर्णधारपद सांभाळत असलेल्या रोहित शर्मा आणि नवीन प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या नेतृत्वाखाली खेळलेली ही पहिली मालिका होती. राहुल द्रविड यांनी विजयानंतर सांगितले की, डावाची सुरुवात चांगली झाली की सहज विजय मिळवता येतो. “या मालिकेत भारतीय संघातील सर्वच खेळाडूंनी चांगली कामगिरी केली, तरीदेखील संघातील सर्वच खेळाडूंनी अतिआत्मविश्वास न बाळगता संयम बाळगणे गरजेचे असल्याचे द्रविड यांनी सांगितले.
न्यूझीलंडविरुद्धच्या विजयानंतर ही मालिका आमच्यासाठी खूप महत्त्वाची होती आणि त्यात विजयही मिळाला. साहिजकच सर्वच खेळाडूंनी सुरुवातीपासून चांगली कामगिरी केली बदल्यात भारतीय संघाला ३-० असा अविस्मरणीय विजय मिळवता आला. मात्र विजयानंतर खेळाडूंनी पाय जमिनीवरच ठेवले पाहिजेत, अति आत्मविश्वास दाखवू नये असे द्रविड यांनी म्हंटले.
दरम्यान , द्रविड यांनी टी-२० मालिकेच्या नियोजनावर देखील प्रश्न उपस्थित केले. त्यांनी सांगितले की, न्यूझीलंडसाठी ही मालिका सोपी नव्हती कारण त्यांचा संघ विश्वकप खेळून अवघ्या ३ दिवसांनंतर या मालिकेसाठी आला होता. अशातच ६ दिवसांत ३ सामने खेळणे कोणत्याही संघासाठी सोपे नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी हे सोपे नव्हते. तर भारतीय संघाला या विजयातून अधिक शिकण्याची गरज असल्याचे द्रविड यांनी म्हंटले.
दरम्यान भारतीय संघाच्या पुढील प्रवासाबाबत द्रविड यांनी म्हंटले की, “पुढील १० महिने आम्हाला कित्येक सामने खेळायचे आहेत. येणाऱ्या विश्वचषकापूर्वी सलग सामने होणार आहेत. त्यामुळे अशातच काही चढ-उतार येऊ शकतात, पण नवीन खेळांडूना चांगले प्रदर्शन करणे संघासाठी गरजेचे आहे. काही खेळाडूंनी मिळालेल्या संधीचा फायदा घेत स्वत:ला सिध्द केले आहे”.