भारत आणि न्यूझीलंडमध्ये झालेला कानपूर मधील पहिला कसोटी सामना पाचव्या दिवसाच्या अखेरीस अनिर्णित ठरला. भारतीय संघ विजयापासून फक्त एक पाऊल दूर होता. मात्र शेवटच्या षटकांत भारतीय गोलंदाजांना शेवटचा बळी घेण्यात अपयश आले आणि न्यूझीलंडच्या संघाला पहिला सामना अनिर्णित करण्यात यश आले. अशातच भारतीय संघाने आपला डाव घोषित करण्यात उशीर केला का असे प्रश्न उपस्थित होत आहेत. कारण भारतीय संघाला अर्धा तास आणखी वेळ मिळाला असता तर कदाचित पहिल्या सामन्याच्या निकालाचे चित्र काहीसे वेगळे असते.
भारतीय संघावर अनेक माध्यमातून प्रश्न उपस्थित होत असतानाचा यावर आता संघाचे प्रशिक्षक द्रविड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सोबतच भारतीय संघाने डाव घोषित करण्याची ती योग्य वेळ असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. द्रविड यांनी सांगितले की, “माझ्या माहितीनुसार आम्ही कोणतीही चूक केलेली नाही. डाव घोषित होण्यापूर्वी अर्धा तास आम्ही दबावात होतो. शेवटी ऋध्दिमान साहाने शानदार फलंदाजी केली. त्यामुळे आम्ही काही वेळ सामन्यात पुनरागमन केले”.
“जर समोरच्या संघाला २४०-२५० पर्यंतचे आव्हान दिले तर त्यांच्याकडे ११० षटकांचा कालावधी राहिला असता. अशातच प्रतिस्पर्धी संघाला ३ पेक्षाही कमी सरासरीने धावा कराव्या लागल्या असत्या आणि ते आमच्यासाठी मोठे आव्हानात्मक ठरले असते. आम्ही चौथ्या दिवसाच्या अखेरीस एक बळी देखील पटकावला होता. शेवटच्या दिवशीही संघाने चांगली कामगिरी केली पण शेवटचा बळी घेता आला नाही. हीच कसोटी क्रिकेटची खासियत आहे”. असे राहुल द्रविड यांनी आणखी सांगितले.