नागपूर : भारत आणि इंग्लंड यांच्यात एकदिवसीय मालिकेला आजपासून (6 फेब्रुवारी) सुरुवात झाली आहे. दोन्ही संघातील पहिला सामना नागपूरच्या व्हिसिए मैदानावर खेळवला जात आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ एकदिवसीय मालिका खेळत आहे. टी-20 मालिकेनंतर आता एकदिवसीय मालिकेतही इंग्लंडचा दारुण पराभव करण्याचे लक्ष्य भारताचे आहे. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने आक्रमक सुरुवात केली. पहिल्या विकेटसाठी 8.5 षटकात 75 धावांची भागिदारी झाली. त्यामुळे इंग्लंड संघ 350 हून अधिक धावा करेल, असे वाटले होते. मात्र भारतीय गोलंदाजांनी इंग्लंड फलंदाजांना एकामागून एक बाद करत त्यांना रोखले. (England could not even score 250 runs in the first ODI due to Indian bowlers)
या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर सलामीवीर फिल सॉल्ट आणि बेन डकेट यांनी आक्रमक सुरुवात केली. त्यामुळे इंग्लंड संघ आजच्या सामन्यात मोठी धावसंख्या उभारेल, अशी शक्तता होती. मात्र 75 धावांवर टी-20 खेळी करणाऱ्या फिल सॉल्ट हा धावबाद झाला. सॉल्टने 26 चेंडूत 5 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 43 धावांची खेळी केली. मात्र यानंतर इंग्लंडचा डाव डळमळीत झाला. एकदिवसीय सामन्यात पदार्पण करणारा वेगवान गोलंदाज हर्षित राणा याने बेन डकेटला बाद करत इंग्लंडला आणखी एक धक्का दिला. डकेट 29 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने 32 धावा करून बाद झाला. यानंतर लगेचच हॅरी ब्रूक खाते न उघडता बाद झाला.
इंग्लंडच्या चार विकेट पडल्यानंतर दिग्गज खेळाडू जो रुट आणि कर्णधार जोस बटलर यांनी चौथ्या विकेटसाठी 34 धावांची भागिदारी करत संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र फिरकीपटू रवींद्र जडेजाने जो रुटला 19 धावांवर बाद केले. यानंतर पुन्हा एकदा जोस बटलर आणि जेकब बेथेल यांच्यात पाचव्या विकेटसाठी 59 धावांची भागिदारी केली. मात्र जोस बटलर बाद झाल्यानंतर पुन्हा एकदा इंग्लंडचा डाव डळमळीत झाला. बटलर 67 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने 52 धावा करून बाद झाला.
एका बाजूने विकेट पडत असताना जेकब बेथेल याने 64 चेंडूत 3 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 51 धावा करून बाद झाला. त्याला जडेजाने बाद केले. यानंतर जोफ्रा आर्चर वगळता एकाही फलंदाजाना मोठी खेळी करता आली नाही. आर्चर 18 चेंडूत 3 चौकार आणि एक छटकार मारून 21 धावांवर नाबाद राहिला. यासह भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडच्या सर्व फलंदाजांना बाद करत त्यांना 248 धावांवर रोखले. भारताकडून हर्षित राणा आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी 3 विकेट घेतल्या, तर मोहम्मद शमी, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. त्यामुळे आता प्रत्युत्तरात भारतीय फलंदाज कसे प्रदर्शन करतात? हे पाहावे लागेल.
हेही वाचा – Champions Trophy 2025 : स्पर्धेआधीच ऑस्ट्रेलियाला धक्का, एकाच दिवसात कर्णधारासह दोन खेळाडू बाहेर