भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये कसोटी मालिकेचा चौथा सामना लंडनच्या ओवल मैदानात खेळवला जात आहे. दोन्ही संघ पाच कसोटी मालिकांच्या सामन्यात १-१ अशा बरोबरीत आहेत. चौथ्या सामन्याचा निकाल तीन्ही बाजुने लागण्याची शक्यता आहे. सामना अनिर्नित राहू शकतो अथवा इंग्लंड किंवा भारताच्या पारड्यात पडण्याची शक्यता आहे. कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवसअखेर इंग्लंडने एकही गडी न गमावता ७७ धावा केल्या असून इंग्लंडला २९१ धावांची गरज आहे. या सामनाच्या निमित्ताने ५० वर्षांचा विक्रम मोडण्याची संधी भारताला आहे.
शार्दूल ठाकूर च्या ६० धावा आणि यष्टीरक्षक ऋषभ पंतच्या ५० धावा यांनी रचलेल्या महत्वाच्या शतकी भागीदारीमुळे चौथ्या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडला ३६८ धावांचे लक्ष्य दिले. मात्र इंग्लंडच्या सलामीवीरांनी रॉरी बर्नस् ३१ धावा हासीब हामीद ४३ धावा अशी दमदार सुरुवात करून भारताला चोख प्रत्युत्तर दिल्यामुळे अखेरच्या दिवशी कोणता संघ बाजी मारतो, हे पाहणे खुपच उत्सुकतेचे ठरणार आहे.
कोणता विक्रम मोडण्याची संधी ?
टीम इंडियाला नवा इतिहास घडविण्याची संधी आहे, जे गेल्या ५० वर्षात टीम इंडियाला करता आले नाही. म्हणजेच इंग्लंडच्या ओवल मैदानात इंडियाला विजयाचा झेंडा रोवता आला नाही, तो पराक्रम करण्याची भारताला संधी आहे. टीम इंडिया (१९३६-२०१८) सालापासून १३ कसोटी सामने ओवल मैदानावर खेळली असून त्यात पाच सामन्यात पराभव तर सात सामने अनिर्नित ठरले आणि एका सामन्यात विजय मिळाला आहे. टीम इंडियाला १९७१ साली एक मात्र विजय या ओवल मैदानावर मिळवता आला.
चौथ्या कसोटीच्या अंतिम दिवसात भारताला विजयाची संधी
टीम इंडिया विरोधात कोणत्याच संघाला ३५० धावांच्या पलीकडील टप्पा चौथ्या डावात गाठता आला नाही. पाचवा दिवस वेगवान गोलंदाज व फिरकी गोलंदाजासाठी महत्वाचा ठरु शकतो. रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह ,उमेश यादव आणि सिराज यांची भुमिका महत्वाची ठरेल.
इंग्लंडला ही विजयाची संधी
इंग्लंडच्या बाजूने पारडं जड असण्याचं कारण म्हणजे ते ओवलवर फार वेगाने धावा काढतात. इंग्लडने याच मैदानामध्ये २००७ साली चौथ्या डावामध्ये ११० षटकांमध्ये ६ खेळाडूंच्या मोबदल्यात ३६९ धावा केल्या होत्या. इंग्लंडला हा सामना जिंकण्यासाठी याच वेगाने फलंदाजी करावी लागणार आहे. पहिल्या सत्रातील खेळावर सामन्याचा निकाल अवलंबून असणार आहे. जो संघ पहिलं आणि दुसरं सत्र चांगल्या पद्धतीने खेळून काढेल त्याच्या विजयाच्या आशा वाढणार आहेत.