आज ‘दावणगेरे एक्सप्रेस’ २५ वर्षे धावल्यानंतर, क्रिकेट आयुष्यात अनेक स्टेशनला मागे सोडत, आता ‘निवृत्ती’ या स्टेशनवर येऊन थांबत आहे, असे म्हणत भारताचा माजी वेगवान गोलंदाज विनय कुमारने आंतरराष्ट्रीय आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. विनय कुमारला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फारसे यश मिळाले नसले तरी स्थानिक क्रिकेटमध्ये त्याने उत्कृष्ट कामगिरी केली. त्याने स्थानिक क्रिकेटमध्ये कर्नाटक आणि पुदुच्चेरी या संघांचे प्रतिनिधित्व केले. विनयने १३९ प्रथम श्रेणी सामन्यांत ५०४ विकेट घेतल्या. यापैकी ४४२ विकेट या त्याने रणजी करंडकात घेतल्या. रणजी स्पर्धेत वेगवान गोलंदाज म्हणून सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम विनयच्या नावे आहे. तसेच या स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांत त्याचा राजिंदर गोएल (६३७), वेंकटराघवन (५३०) आणि सुनील जोशी (४७९) यांच्यानंतर चौथा क्रमांक लागतो.
Thankyou all for your love and support throughout my career. Today I hang up my boots. 🙏🙏❤️ #ProudIndian pic.twitter.com/ht0THqWTdP
— Vinay Kumar R (@Vinay_Kumar_R) February 26, 2021
मायकल हसीची विकेट
विनयला २०११-१२ ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळाली. पर्थ येथे झालेल्या या कसोटीत त्याने मायकल हसीला बाद केले. मात्र, ही त्याची कसोटी क्रिकेटमधील एकमेव विकेट ठरली. त्याला यानंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुन्हा संधी मिळाली नाही. एकदिवसीय क्रिकेटमध्ये विनयला थोडे यश मिळाले. त्याने ३१ एकदिवसीय सामन्यांत ३८ विकेट घेतल्या.
कर्नाटकाच्या यशात महत्वाची भूमिका
विनयच्या नेतृत्वात कर्नाटकाने २०१३ आणि २०१५ असे दोनदा एकाच मोसमात विजय हजारे करंडक, रणजी करंडक आणि इराणी करंडक अशा तीन स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला. कर्नाटकाच्या या यशात विनयने कर्णधार आणि गोलंदाज म्हणून महत्वाची भूमिका बजावली. तसेच त्याने आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, मुंबई इंडियन्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि कोची टस्कर्स या संघांचे प्रतिनिधित्व केले.