कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, यंदा आयपीएल स्पर्धा भारताऐवजी युएईमध्ये होत आहे. आधी या स्पर्धेला मार्चच्या अखेरीस सुरुवात होणार होती, पण कोरोनामुळे ही स्पर्धा लांबणीवर पडली. मात्र, ही स्पर्धा न झाल्यास बीसीसीआयचे मोठे आर्थिक नुकसान झाले असते. त्यामुळे कडक नियम आणि प्रतिबंधांसह या स्पर्धेला १९ सप्टेंबरपासून युएईमध्ये सुरुवात झाली. आयपीएल ही जगातील सर्वात मोठी टी-२० स्पर्धा मानली जाते. त्यामुळे ही स्पर्धा होणे गरजेचे असल्याचे दिल्ली कॅपिटल्सचा यष्टीरक्षक-फलंदाज अॅलेक्स कॅरीला वाटते. तसेच मी या स्पर्धेत खेळण्यास आतुर असल्याचेही कॅरी म्हणाला.
परिस्थिती सर्वांसाठीच अवघड
सध्याची परिस्थिती सर्वांसाठीच अवघड आहे. त्यामुळे यंदा आयपीएल न होण्याचा धोका होता. मात्र, आता युएईत का होईना, ही स्पर्धा होत असल्याचा आनंद आहे. आम्ही (ऑस्ट्रेलियन खेळाडू) इथे येण्यापूर्वी इंग्लंडमध्ये जैव-सुरक्षित वातावरणात होतो. इंग्लंडविरुद्धची मालिका संपल्यावर आम्ही थेट युएईमध्ये दाखल झालो. इथे सुरुवातीचे २४ तास हॉटेलमध्येच थांबलो आणि आमची कोरोना चाचणीही झाली. त्यानंतरच आम्हाला खेळण्याची परवानगी मिळाली. मी आता या स्पर्धेत खेळण्यास खूप आतुर आहे, असे कॅरी म्हणाला.
रबाडा यॉर्कर टाकेल याची खात्री होती
दिल्लीचा यंदाच्या स्पर्धेत पहिला सामना किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध झाला. चुरशीचा झालेला हा सामना सुपर ओव्हरमध्ये गेला, ज्यात दिल्लीने बाजी मारली. या सामन्यात कॅरीला खेळण्याची संधी मिळाली नाही. या सामन्याविषयी त्याने सांगितले की, हा माझा आयपीएलमधील पहिला सामना होता आणि तो सुपर ओव्हरमध्ये गेला. सुपर ओव्हर सुरु झाली तेव्हा आमचे पारडे थोडे जड होते. कागिसो रबाडा चांगली गोलंदाजी करेल याचा मला विश्वास होता आणि तसेच झाले. मी त्याच्याविरुद्ध खेळलो आहे. त्यामुळे तो यॉर्कर टाकत फलंदाजांना अडचणीत टाकेल याची मला खात्री होती.