इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना आणि कसोटी मालिकेसाठी शुक्रवारी (काल) भारतीय संघाची घोषणा झाली. या दौऱ्यासाठी तब्बल २० सदस्यीय संघाची निवड झाली. मात्र, अष्टपैलू हार्दिक पांड्याला संघात स्थान मिळाले नाही. काही महिन्यांपूर्वी भारत आणि इंग्लंड यांच्यात चार सामन्यांची कसोटी मालिका झाली. या मालिकेसाठी हार्दिकची भारतीय संघात निवड झाली होती, पण त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. मात्र, असे असले तरी हार्दिक जूनमध्ये सुरु होणाऱ्या इंग्लंड दौऱ्यात आमच्यासाठी महत्वाची भूमिका बजावू शकेल, असे भारताचा कर्णधार विराट कोहली म्हणाला होता. परंतु, कर्णधाराच्या या विधानानंतरही हार्दिकला इंग्लंड दौऱ्यासाठी संघात स्थान मिळाल्याचे अनेकांना आश्चर्य वाटले. आता हार्दिकला संघातून डच्चू का मिळाला याचे कारण स्पष्ट झाले आहे.
सातत्याने गोलंदाजी करू शकत नाही हे स्पष्ट
हार्दिकच्या पाठीला दुखापत असल्याने २०१९ मध्ये त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर तो बराच काळ गोलंदाजी करत नव्हता. त्याने मागील वर्षीच्या आयपीएलमध्येही गोलंदाजी केली नाही. मात्र, यंदाच्या आयपीएलपूर्वी झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या टी-२० आणि एकदिवसीय मालिकेत त्याने बरीच षटके टाकली. परंतु, त्याचा खांदा दुखावल्याने तो यंदा आयपीएलमध्ये एकही षटक टाकू शकला नाही. त्यामुळे आता हार्दिक सातत्याने गोलंदाजी करू शकत नाही, हे स्पष्ट झाल्यानेच त्याला इंग्लंड दौऱ्यासाठी कसोटी संघात स्थान मिळाले नाही.
फलंदाजीवर अधिक लक्ष
हार्दिकच्या पाठीवर शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्याने गोलंदाजीच्या शैलीत (अॅक्शनमध्ये) बदल केला. त्याने काही सामन्यांत गोलंदाजीही केली. मात्र, आता त्याचा खांदा दुखावला आहे. सतत गोलंदाजी करणे आपल्यासाठी घातक ठरेल हे आता हार्दिकलाही कळले आहे. त्यामुळे तो आता त्याच्या फलंदाजीवर अधिक लक्ष देत आहे, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.