भारतीय संघ पुढील महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना, तसेच इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या सामन्यांसाठी भारताच्या २० सदस्यीय संघाची घोषणा झाली. अष्टपैलू हार्दिक पांड्याला या संघात स्थान मिळाले नाही. २०१९ मध्ये पाठीच्या दुखापतीमुळे हार्दिकवर शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर त्याला सातत्याने गोलंदाजी करण्यात अपयश येत आहे. त्यामुळेच त्याची कसोटी संघात निवड झालेली नाही. हार्दिक गोलंदाजी करत नसल्यास त्याला एकदिवसीय आणि टी-२० संघातूनही वगळले पाहिजे, असे भारताचे माजी क्रिकेटपटू आणि निवड समितीचे माजी सदस्य शरणदीप सिंग यांना वाटते.
केवळ फलंदाज म्हणून संघात स्थान नाही
हार्दिकला कसोटी संघात स्थान न देण्याचा निवड समितीचा निर्णय योग्य आहे. त्याच्यावर शस्त्रक्रिया झाल्यापासून त्याला नियमितपणे गोलंदाजी करता आलेली नाही. माझ्या मते, एकदिवसीय क्रिकेट आणि टी-२० क्रिकेटमध्ये त्याने अनुक्रमे १० आणि चार षटके टाकणे गरजेचे आहे. तो गोलंदाजी करत नसेल तर त्याला अंतिम ११ मधून वगळले पाहिजे. त्याला केवळ फलंदाज म्हणून संघात स्थान मिळू शकत नाही, असे शरणदीप म्हणाले.
भारतीय संघ अडचणीत सापडतो
हार्दिक गोलंदाजी करत नसल्यास संघाचे संतुलन बिघडते. तुम्हाला एक अतिरिक्त गोलंदाज खेळवणे भाग पडते. त्यामुळे सूर्यकुमार यादवसारख्या चांगल्या फलंदाजाला संघाबाहेर बसावे लागते. एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतीय संघ केवळ पाच गोलंदाजांसह खेळू शकत नाही. एकाही गोलंदाजाने खराब कामगिरी केल्यास संघ अडचणीत सापडतो. त्यामुळे हार्दिक गोलंदाजी करत नसल्यास अष्टपैलू म्हणून भारताने जाडेजा, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल आणि शार्दूल ठाकूर यांचा विचार केला पाहिजे, असेही शरणदीप यांनी सांगितले.