सनरायजर्स हैदराबादचा अष्टपैलू विजय शंकरला यंदाच्या आयपीएल मोसमात चांगली कामगिरी करण्यात अपयश येत होते. त्यामुळे त्याला संघातील स्थानही गमवावे लागले होते. मात्र, काही सामन्यांपूर्वी त्याचे संघात पुनरागमन झाले आणि गुरुवारी झालेल्या राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात त्याने अप्रतिम कामगिरी केली. या सामन्यात आधी गोलंदाजीत त्याने १५ धावांत १ विकेट घेतली. त्यानंतर फलंदाजीत आपली चमक दाखवताना ५१ चेंडूत ६ चौकारांच्या मदतीने नाबाद ५२ धावांची खेळी केली. तसेच त्याने मनीष पांडेच्या (नाबाद ८३) सोबतीने तिसऱ्या विकेटसाठी १४० धावांची अभेद्य भागीदारी रचत हैदराबादला विजय मिळवून दिला. माझ्यासाठी हा करो या मरोचा सामना होता, असे सामन्यानंतर विजय शंकर म्हणाला.
चांगली कामगिरी करायची होती
माझ्यासाठी हा ‘करो या मरो’चा सामना होता. मी या सामन्याकडे अशा दृष्टीने पाहिले. याआधीच्या सामन्यांत मला फलंदाजीत फारसे योगदान देता आले नव्हते. त्यामुळे या सामन्यात मला काहीही करून चांगली कामगिरी करायची होती. सुदैवाने किंवा दुर्दैवाने, आम्ही दोन विकेट लवकर गमावल्या. त्यामुळे मला वरच्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्यात आले. या संधीचा फायदा घेतल्याचा मला आनंद असल्याचे विजय शंकरने सांगितले. तसेच याआधीही आम्हाला काही सामने जिंकायची संधी होती, असेही विजय शंकर म्हणाला. याआधी आम्ही मोक्याच्या क्षणी चांगला खेळ न केल्याने काही सामने गमावले होते. त्यामुळे हा सामना जिंकणे आमच्यासाठी महत्त्वाचे होते. या विजयामुळे संघातील प्रत्येक सदस्याचा आत्मविश्वास वाढला आहे, असेही विजय शंकरने सांगितले.
𝟓𝟐* 𝐨𝐟𝐟 𝟓𝟏 👏
𝟏/𝟏𝟓 𝐢𝐧 𝟑 𝐨𝐯𝐞𝐫𝐬 🙌What a comeback from @vijayshankar260 🧡#RRvSRH #OrangeArmy #KeepRising #IPL2020 pic.twitter.com/4o2MuAfY3t
— SunRisers Hyderabad (@SunRisers) October 23, 2020