कर्णधार डेविड वॉर्नरच्या अर्धशतकानंतरही सनरायजर्स हैदराबादला आयपीएलमध्ये बुधवारी झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात हैदराबादच्या गोलंदाजांनी चांगला मारा करत बंगळुरूला २० षटकांत ८ बाद १४९ धावांवर रोखले होते. मात्र, त्यांच्या फलंदाजांनी निराशा केली. वॉर्नर (५४) आणि मनीष पांडे (३८) यांनी दुसऱ्या विकेटसाठी ८३ धावा जोडल्या. हे दोघे बाद झाल्यावर मात्र हैदराबादचा डाव गडगडला आणि त्यांनी हा सामना ६ धावांनी गमावला. आमचा संघ सुस्थितीत होता. मात्र, आम्ही झटपट विकेट गमावल्या आणि आमचा पराभव झाल्याचे वॉर्नर सामन्यानंतर म्हणाला.
Yet another sensational finish at The Chepauk as #RCB beat #SRH by 6 runs.
Scorecard – https://t.co/apVryOzIWv #SRHvRCB #VIVOIPL pic.twitter.com/G3cVkk4GJr
— IndianPremierLeague (@IPL) April 14, 2021
फलंदाजांनी निराशा केली
हा पराभव पचवणे अवघड आहे. आमच्या गोलंदाजांनी चांगला मारा केला. त्यामुळे बंगळुरूला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. फलंदाजीत आम्ही अधिक जबाबदारीने खेळून मधल्या फळीत मोठी भागीदारी रचणे गरजेचे होते, पण त्यात आम्हाला अपयश आले. आमच्या फलंदाजांनी निराशा केली. डावखुऱ्या फिरकीपटूविरुद्ध आडव्या बॅटने फटके मारणे योग्य नाही. आम्ही हा सामना ज्याप्रकारे गमावला ते निराशाजनक होते, असे वॉर्नर म्हणाला.
पुढील सामना मुंबईविरुद्ध
आमचे पुढील तीन सामनेही चेन्नईतच होणार असून खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली होत आहे. याचा आम्ही फायदा करून घेणे गरजेचे असल्याचेही वॉर्नर म्हणाला. हैदराबादला यंदाच्या मोसमाची चांगली सुरुवात करण्यात अपयश आले आहे. त्यांना पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने, तर दुसऱ्या सामन्यात बंगळुरूने पराभूत केले. त्यांचा तिसरा सामना शनिवारी मुंबई इंडियन्सविरुद्ध होणार आहे.