भारत आणि श्रीलंकेमध्ये बंगळुरूत डे-नाईट कसोटी सामना खेळवण्यात आला होता. भारताने सामना जिंकून श्रीलंकेला कसोटी सामन्यात २-० च्या फरकाने क्लीन स्वीप दिली आहे. मात्र आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउंसिलने (आयसीसी) भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाला मोठा झटका दिला आहे.
आयसीसीने म्हटलं आहे की, मॅच रेफरी जवागल श्रीनाथांनी डे-नाईट कसोटी सामन्यात वापरण्यात आलेली बंगळुरूतील खेळपट्टी सरासरीपेक्षा कमी असल्याचे सांगितले आहे. यामुळे बंगळूरुतील खेळपट्टीला आयसीसी पीच अँड आउटफील्ड मॉनीटरिंग प्रोसेस अंतर्गत एक डिमेरिट पॉइंट मिळाला आहे.
पहिल्या दिवशी खेळपट्टीवर वळण मिळत होते तसेच जसा सामना पुढे सरकत गेला तशी खेळपट्टी सुधारताना दिसली. माझ्या विचारानुसार या सामन्यात बॅट आणि चेंडूचा सामना नव्हता असा अहवाल बीसीसीआयला आयसीसीने पाठवला आहे.
भारताने दुसरा कसोटी सामना २३८ धावांनी जिंकला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने हा सामना ३ दिवसांतच संपवला आहे. रविचंद्रन अश्विन आणि जसप्रीत बुमराह बंगळूरू कसोटी सामन्यात उत्कृष्ट खेळाडू ठरले आहेत. अश्विनने मॅचमध्ये ४ गडी बाद केले आहेत. तर बुमराह पहिल्या डावात ५ तर दुसऱ्या डावात ३ विकेट घेतले होते.
तर श्रीलंकाचा कर्णधार करुणारत्ने याने चांगली खेळी करत कसोटी सामन्यातील १४ वे शतक झळकवले आहे. भारताने श्रीलंकेला ४४७ धावांचे लक्ष्य दिले असून २०८ धावांवर सामना गुंडाळला आहे. मोहालीमध्ये खेळवण्यात आलेल्या पहिल्या कसोटीत भारताने डाव २२२ धावांनी जिंकला होता.