भारतात कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्यामुळे यावर्षी भारतामध्ये होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. या टी-२० वर्ल्डकपला ऑक्टोबरमध्ये सुरुवात होणार असून कोरोनाचा प्रादुर्भाव कायम राहिल्यास ही स्पर्धा भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (ICC) इतरत्र हलवावी लागू शकेल. भारतात हा टी-२० वर्ल्डकप न होऊ शकल्यास आयसीसीने युएईचा पर्याय समोर ठेवला आहे. मात्र, हा टी-२० वर्ल्डकप भारतातच व्हावा यासाठी बीसीसीआय प्रयत्नशील असून या स्पर्धेचे सामने नऊ ऐवजी पाच ठिकाणी होऊ शकतील असे त्यांचे म्हणणे आहे. तसेच ऑक्टोबरला अजून बराच काळ शिल्लक असून युएईचा आताच विचार करण्याची गरज नसल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले.
सामने चार किंवा पाच ठिकाणी?
टी-२० वर्ल्डकपला अजून पाच महिने शिल्लक आहेत. तसेच आता जास्तीजास्त नागरिकांना कोरोनाची लस देण्यात येत आहे. त्यामुळे यंदा टी-२० वर्ल्डकप भारतातच होईल अशी आम्हाला आशा आहे. मात्र, या स्पर्धेचे सामने नऊ ऐवजी चार किंवा पाच ठिकाणी खेळवण्याचा विचार आम्ही करू शकतो, असे बीसीसीआयच्या एका सिनियर अधिकाऱ्याने सांगितले.
आयसीसीच्या पथकाचा भारत दौरा लांबणीवर
भारतात सध्या आयपीएल स्पर्धा सुरु आहे. आयसीसीचे पथक २६ एप्रिलला भारतात येऊन आयपीएलच्या बायो-बबलची, तसेच इतर व्यवस्थांची पाहणी करणार होते. त्यावरून टी-२० वर्ल्डकप भारतात होऊ शकतो की नाही, याबाबतचा निर्णय घेण्यात येणार होता. परंतु, भारतात हवाई वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आल्याने आयसीसीच्या पथकाला भारत दौरा पुढे ढकलणे भाग पडले.