हार्दिक पांड्या, रविंद्र जाडेजाची तुफान फटकेबाजी आणि बुमरा, नटराजन आणि शार्दुल ठाकूरच्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाला पराभूत केले आहे. भारताने १३ धावांनी सामना जिंकत व्हाईटवॉश टाळला. ऑस्ट्रेलियाकडून फिंच, मॅक्सवेल यांनी फटकेबाजी करत चांगली झुंज दिली, परंतू मोक्याच्या क्षणी भारतीय गोलंदाज वरचढ ठरले. भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करत ३०३ धावांचे उद्दीष्ट ऑस्ट्रेलियाला दिले. भारताकडून विरोट कोहली, हार्दिक पांड्या आणि जाडेजाने अर्धशतके झळकावली. ऑस्ट्रेलियाकडून अॅगरने २ बळी घेतले.
भारताने दिलेल्या ३०३ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. वॉर्नरच्या अनुपस्थितीत सलामीला आलेला लाबुशेन नटराजनच्या गोलंदाजीवर स्वस्तात माघारी परतला. यानंतर शार्दुल ठाकूरने स्मिथला माघारी धाडत कांगारुंला दुसरा धक्का दिला. दोन सामन्यांत शतक झळकावणारा स्मिथ अखेरच्या वन-डेत ७ धावा काढून माघारी परतला. यानंतर हेन्रिकेज आणि फिंच यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. शार्दुलने हेन्रिकेजला माघारी धाडत ही जोडी फोडली. दरम्यान एक बाजू सांभाळून असलेल्या फिंचने आपले अर्धशतक पूर्ण केले. फिंचने ८२ चेंडूत ७ चौकार आणि ३ षटकारांसह ७५ धावांची खेळी केली. जाडेजाने फिंचला माघारी धाडत ऑस्ट्रेलियाच्या अडचणींमध्ये भर टाकली. यानंतर भारतीय गोलंदाजांची धुलाई करत मॅक्सवेलने ऑस्ट्रेलियाचे आव्हान कायम ठेवले. मॅक्सवेल सामना जींकवून देईल असे वाटत असताना ३८ चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकारांसह मॅक्सवेलने ५९ धावा केल्यानंतर बुमराहने त्याचा त्रिफळा उडवला ऑस्ट्रेलियाच्या जिंकण्याच्या आशा समाप्त केल्या. भारताकडून शार्दुल ठाकूरने ३, टी. नटराजन, जसप्रीत बुमराहने २ तर कुलदीप आणि जाडेजा यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.