भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांनी आपली दमदार कामगिरी सुरूच ठेवली. चेतेश्वर पुजाराचे शतक तर मयांक अगरवाल, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या अर्धशतकांमुळे भारताने आपला पहिला डाव ७ बाद ४४३ वर घोषित केला. त्यांनी दिवसाचा अखेरचा अर्धा तास ऑस्ट्रेलियाला फलंदाजीला बोलावले. मात्र भारताच्या गोलंदाजांना विकेट घेता आली नाही. त्यामुळे सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाची ६ षटकांत बिनबाद ८ अशी धावसंख्या आहे.
पुजाराचे मालिकेतील दुसरे शतक
या सामन्याची दुसऱ्या दिवसाची २ बाद २१५ वरून पुढे सुरुवात केली. पहिल्या दिवसअखेर पुजारा ६८ तर कोहली ४७ धावांवर नाबाद होता. कोहलीने दिवसाच्या पहिल्याच षटकात आपले अर्धशतक पूर्ण केले. पुढे या दोघांनीही सावध फलंदाजी सुरु ठेवली. या डावाच्या ११३ व्या षटकात नेथन लायनला चौकार लगावत पुजाराने आपले कसोटी कारकिर्दीतील १७ वे तर या मालिकेतील दुसरे शतक पूर्ण केले. त्याच्या चांगल्या फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाला पहिल्या सत्रात एकही विकेट घेता आली नाही. लंचपर्यंत भारताचा स्कोर २ बाद २७७ असा होता.
That’s lunch! Pujara (103*) and Kohli (69*) bat through the morning with India going to the break at 2-277: https://t.co/0glOblMnaq #AUSvIND pic.twitter.com/Rk4x3nYrON
— cricket.com.au (@cricketcomau) December 27, 2018
रोहितचे अर्धशतक
लंचनंतर कोहलीला स्टार्कने ८२ धावांवर बाद केले. तर पुजाराही १०६ धावांवर बाद झाला. त्याला पॅट कमिन्सने बाद केले. पुढे अजिंक्य रहाणे (३४), रोहित शर्मा (नाबाद ६३) आणि रिषभ पंत (३९) यांनी चांगली फलंदाजी करत भारताच्या धावसंख्येत भर घातली. दुसरा दिवस संपायला अर्धा तास बाकी असताना कर्णधार कोहलीने भारताचा डाव ७ बाद ४४३ वर घोषित केला. ऑस्ट्रेलियाकडून कमिन्सने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या.