इंग्लंड विरूद्धच्या अंतिम आणि निर्णायक सामन्यात इंग्लंडला ७ धावांनी पराभूत करत भारताने रोमहर्षक असा विजय मिळवला. या विजयासह भारताने वनडे मालिका २-१ अशी खिशात घातली. भारताने प्रथम फलंदाजी करत ३२९ धावा केल्या. त्याचा पाठलाग करताना इंग्लंड ने ९ बाद ३२२ धावा केल्या. भारताकडून शार्दूल ठाकूरने ४, भुवनेश्वर कुमारने ३ तर टी नटराजन याने १ विकेट घेतली.
भारताच्या ३३० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडच्या डावाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर जेसन रॉयला भुवनेश्वर कुमारने त्रिफळाचीत केलं. जेसन रॉयने ६ चेंडूत १४ धावा केल्या. जेसन रॉय बाद झाल्यानंतर लगेच तिसऱ्या षटकात भुवनेश्वर कुमारने जॉनी बेयरस्टोला पायचीत केलं. त्यानंतर डेव्हिड मलान आणि जोस बटलर यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, शार्दूल ठाकूरने त्यांचा हा प्रयत्न अयशस्वी ठरवला. त्याने बटलरला पायचीत करत तंबूत परत पाठवलं. शेवटच्या काही षटकांमध्ये सामना रोमांचक बनला. मार्क वूड आणि सॅम करनने हा सामना रोमांचक बनवला.