भारत आणि इंग्लंड या संघांमध्ये पुढील महिन्यापासून पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. परंतु, या मालिकेवर कोरोनाचे सावट आहे. भारताचा यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंतला कोरोनाची बाधा झाली आहे. पंत मागील आठ दिवस क्वारंटाईन असून आणखी काही दिवस त्याला भारताच्या इतर खेळाडूंपासून दूर राहावे लागणार आहे. त्यातच मागील आठवड्यात इंग्लंडच्या काही खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ सदस्यांचाही कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे इंग्लंडला पाकिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी संपूर्ण नव्या संघाची निवड करणे भाग पडले होते. कोरोनाचा कहर असाच सुरु राहिल्यास आणि क्वारंटाईनच्या नियमांमध्ये बदल न झाल्यास त्याचा भारत-इंग्लंड मालिकेवर परिणाम होईल अशी भीती इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने व्यक्त केली आहे.
क्वारंटाईनच्या नियमांमध्ये बदल होणे गरजेचे
अलगीकरणाच्या (आयसोलेशन) नियमांमध्ये बदल न झाल्यास द हंड्रेड आणि भारतीय कसोटी मालिकेबाबत मला भीती वाटते आहे. रिषभ पंतला ज्याप्रकारे कोरोनाची बाधा झाली आहे, त्याचप्रकारे आणखी काहींनाही कोरोना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच पुढे जाऊन अॅशेस मालिकेतून काही खेळाडू माघार घेण्याचीही भीती आहे. त्यामुळे बायो-बबल आणि क्वारंटाईनच्या नियमांमध्ये बदल होणे गरजेचे आहे, असे वॉनने त्याच्या ट्विटमध्ये लिहिले.
I fear for the 100 & the Indian Test series unless the isolation laws change .. we are bound to have cases as is the case with @RishabhPant17 .. plus further down the line I fear the Ashes could be hugely affected with players pulling out unless bubbles/quarantine rules change !
— Michael Vaughan (@MichaelVaughan) July 15, 2021
पंत सराव सामन्याला मुकणार
इंग्लंडमध्ये होणाऱ्या पहिल्यावहिल्या द हंड्रेड स्पर्धेला २१ जुलैपासून सुरुवात होईल. त्यानंतर भारत आणि इंग्लंड या संघांमध्ये ४ ऑगस्टपासून पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेपूर्वी भारतीय संघ कौंटी सिलेक्ट इलेव्हन या संघासोबत सराव सामना खेळणार आहे. कोरोनाची बाधा झाल्यामुळे पंतला या सामन्याला मुकावे लागणार आहे.