क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्सवर झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडला (Ind vs Eng) पराभूत करत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. भारताने जरी ऐतिहासिक विजय मिळवला असला तरी कर्णधार विराट कोहलीचा (Virat Kohli) खराब फॉर्म चिंतेचा विषय बनला आहे. विराटच्या खराब फॉर्मवर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) प्रतिक्रिया दिली आहे.
पहिल्या दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये विराट कोहलीला नावाला साजेशी खेळी करता आलेली नाही. इंग्लंडमधील त्यांच्या मागील पाच इनिंग्जमधील धावा पाहिल्या तर ४४, १३, ०, ४२ आणि २० अशा आहेत. विराटला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक मारुन जवळपास दोन वर्ष झाली आहेत. दरम्यान, विराटच्या खराब फॉर्मवर सचिन तेंडुलकरने भाष्य केलं आहे. सचिनने त्याच्या खराब फॉर्ममागील कारण सांगितलं आहे.
विराट कोहलीची सुरुवात चांगली झालेली नाही आहे. डावाची सुररुवात जर चांगली झाली नाही तर डोक्यात अनेक विचार येऊ लागतात. याचा परिणाम खेळावर होतो. जेव्हा एखादा फलंदाज खराब फॉर्ममध्ये असतो तेव्हा त्याचे फुटवर्क व्यवस्थित होत नाही. हे सर्वांसोबत होत असतं, असं सचिन म्हणाला.
दरम्यान, सचिनने चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांच्यात झालेल्या १०० धावांच्या भागिदारीचं कौतुक केलं आहे. पुजारा आणि रहाणेच्या भागीदारीमुळे भारताचं सामन्यातील आव्हान कायम राहिलं. भारताने दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडला पराभूत केलं. सामन्याच्या शेवटच्या दिवशी ज्या पद्धतीने भारतीय संघाने इंग्लंडला पराभूत केलं आहे ते कौतुकास्पद आहे. भारताने इंग्लंडला १५१ धावांनी पराभूत करत पाच सामन्यांच्या या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.