भारतीय संघाने न्यूझीलंडविरूध्दच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी शानदार खेळी करून संघाची मजबूत पकड बनवली आहे. कानपूरच्या ग्रीनपार्क मैदानावर सुरू असलेल्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने पहिल्या दिवसाअखेर ८४ षटकांत ४ बळी गमावून २५८ धावा केल्या. दरम्यान पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर श्रेयस अय्यर (७५) आणि रवींद्र जडेजा (५०) धावांवर नाबाद राहिले आहेत. या दोघांनी २०८ चेंडूत ११३ धावांची भागीदारी नोंदवली आहे. दिवसाच्या तिसऱ्या सत्रात अय्यर आणि जडेजाने शानदार फलंदाजी केली आणि दिवसाच्या शेवटीला संघाला कोणताच झटका बसू दिला नाही.
तिसऱ्या सत्रात जडेजा आणि अय्यरच्या जोडीने २८ षटकांत १०२ धावा केल्या. यापूर्वी चहाच्या सत्रापर्यंत भारतीय संघाची धावसंख्या ४ बाद १५४ एवढी होती आणि तेव्हा संघ कठिण परिस्थितीचा सामना करत होता. दरम्यान या दोघांच्या जोडीने डावाला सावरले आणि न्यूझीलंडच्या गोलंदाजावर दबाव राखून ठेवला.
पहिल्या सामन्यात सलामीवीर म्हणून पहिल्यांदाच फलंदाजीसाठी उतरलेल्या शुभमन गिलने ९३ चेंडूत ५२ धावांची अर्धशतकीय खेळी केली. तर उपकर्णधार चेतेश्वर पुजाराने ८८ चेंडूत २६ धावांची खेळी केली. कर्णधार अजिंक्य रहाणे सुरूवापासून चांगली खेळी करत होता. मात्र तो ६३ चेंडूत ३५ धावा करून बाद झाला. तर मयंक अग्रवालला १३ धावांवर जेमीसनने बाद केले.
न्यूझीलंडकडून काइल जेमिसनने शानदार गोलंदाजी केली. त्याने ३ बळी घेतले. तर टिम साउदीला १ बळी घेण्यात यश आले. लक्षणीय बाब म्हणजे खराब प्रकाशामुळे पहिल्या दिवसाचा खेळ ६ षटकापूर्वीच संपवावा लागला.
हे ही वाचा: Indonesia Open 2021 : पी.व्ही सिंधूने सहज विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत केला प्रवेश