शिखर धवनच्या नेतृत्वातील भारतीय संघाचे श्रीलंकेतील पहिले सराव सत्र शुक्रवारी पार पडले. भारताचे खेळाडू सोमवारी श्रीलंकेत दाखल झाले होते. त्यांना पुढील तीन दिवस क्वारंटाईन व्हावे लागले होते. परंतु, क्वारंटाईनचा कालावधी संपल्यावर भारतीय संघाने सरावाला सुरुवात केली. श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाच्या कर्णधारपदी झालेल्या शिखर धवन, तसेच प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी खेळाडूंशी संवादही साधला. भारतीय संघ या दौऱ्यात तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० सामने खेळणार आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपपूर्वी ही भारताची अखेरची मालिका आहे.
📸📸 Snapshots from #TeamIndia‘s first training session in Sri Lanka 💪💪#SLvIND pic.twitter.com/hzBx8DNye2
— BCCI (@BCCI) July 2, 2021
नवख्या खेळाडूंची निवड
कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांसारखे भारताचे प्रमुख खेळाडू सध्या आगामी कसोटी मालिकेसाठी इंग्लंडमध्ये आहे. त्यामुळे श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघात बऱ्याच नवख्या खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. तसेच चेतन साकारिया, कृष्णप्पा गौतम, नितीश राणा, देवदत्त पडिक्कल, वरूण चक्रवर्ती आणि ऋतुराज गायकवाड या सहा याआधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेल्या सहा खेळाडूंचा या संघात समावेश आहे. हे सर्व खेळाडू शुक्रवारी सराव करताना दिसले.
१३ जुलैपासून एकदिवसीय मालिका
भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यात तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० सामने खेळणार आहे. यापैकी एकदिवसीय सामने हे १३, १६ आणि १८ जुलैला, तर टी-२० मालिकेचे सामने २१, २३ आणि २५ जुलैला होतील. हे सर्व सामने कोलंबो येथे होणार आहे. या दौऱ्यात धवनला पहिल्यांदा भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळत आहे.