मनदीप सिंग आणि आकाशदीप सिंग यांच्या गोलच्या जोरावर भारतीय हॉकी संघाने तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात बेल्जियमवर २-० अशी मात केली. या सामन्यात मनदीपने ३९ आणि आकाशदीप सिंगने ५४ व्या मिनिटाला गोल करत भारताचा विजय मिळवून दिला.
या सामन्याच्या पहिल्या सत्रात भारताने दमदार खेळ केला. त्यांना सुरुवातीलाच पेनल्टी कॉर्नर मिळाला. यावर मारलेला फटका बेल्जियमचा गोलरक्षक लॉईक वॅन डॉरेनने अडवला. यानंतर भारताचा गोलरक्षक क्रिशन पाठकच्या अप्रतिम खेळामुळे बेल्जियमला गोल करता आला नाही. त्यामुळे या सामन्याच्या मध्यंतराला गोलशून्य बरोबरी होती.
तिसर्या सत्रात भारताने चांगला खेळ सुरू ठेवला. याचा फायदा त्यांना ३९ व्या मिनिटाला मिळाला. मनदीपने गोल करत भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. चौथ्या आणि अखेरच्या सत्रात बेल्जियमला आक्रमक खेळ करावा लागला. त्यांना काही संधीही मिळाल्या. मात्र, क्रिशनच्या जागी गोलरक्षक म्हणून आलेल्या अनुभवी श्रीजेशने बेल्जियमला गोल करण्यापासून अडवले. अखेर ५४ व्या मिनिटाला आकाशदीप सिंगने गोल करत भारताची आघाडी दुप्पट केली. आता या मालिकेतील दुसरा सामना २८ सप्टेंबर रोजी होणार आहे.