भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला शनिवारपासून सुरुवात होत आहे. चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर झालेला पहिला कसोटी सामना भारताने २२७ धावांनी गमावला होता. त्यामुळे चेन्नईतच होणारा दुसरा कसोटी सामना जिंकत मालिकेत दमदार पुनरागमन करण्याचे भारताचे लक्ष्य असेल. भारताला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी गाठायची असल्यास त्यांना इंग्लंडविरुद्धच्या या मालिकेत आणखी एकही गमावून चालणार नाही. दुसऱ्या कसोटीत डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेल आणि चायनामन फिरकीपटू कुलदीप यादवला संधी मिळण्याची शक्यता आहे. अक्षरचे हे कसोटीत पदार्पण असेल, तर कुलदीपचा दोन वर्षांत पहिलाच कसोटी सामना असेल.
नदीम, सुंदर पहिल्या कसोटीत अपयशी
भारतीय संघ घरच्या मैदानावर खेळत असल्याने या मालिकेत भारताचे पारडे जड मानले जात होते. पहिल्या कसोटीत मात्र विराट कोहलीच्या भारताने निराशाजनक खेळ केला. भारताने या कसोटीत रविचंद्रन अश्विन, शाहबाझ नदीम आणि वॉशिंग्टन सुंदर या तीन फिरकीपटूंसह मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला होता. अश्विनने उत्कृष्ट गोलंदाजी करत ९ विकेट घेतल्या. मात्र, नदीम आणि सुंदर यांना फारसे यश लाभले नाही. त्यामुळे दुसऱ्या कसोटीत या दोघांना वगळून भारत अक्षर पटेल आणि कुलदीप यांना संघात स्थान देऊ शकेल.
किमान दोन सामने जिंकणे गरजेचे
चेन्नई येथे होणाऱ्या या कसोटीत आसनसंख्येच्या ५० टक्के प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश दिला जाणार आहे. याचा भारतीय संघाला फायदा होऊ शकेल. भारताला जागतिक कसोटी स्पर्धेची अंतिम फेरी गाठायची असल्यास या मालिकेत किमान दोन सामने जिंकणे गरजेचे आहे. त्यामुळे कोहलीचा संघ आता अधिक जिद्दीने खेळताना दिसेल. या सामन्यात भारत संघामध्ये काही बदल करणे अपेक्षित आहे. अक्षर आणि कुलदीप यांच्यासह मोहम्मद सिराज आणि हार्दिक पांड्या यांनाही संधी मिळू शकेल. हे खेळाडू या संधीचा कसा वापर करतात हे पाहणे महत्वाचे ठरेल.