नवी दिल्ली : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये आज (20 फेब्रुवारी) दुसरा सामना भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात बांग्लादेश संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यांचे पाच फलंदाज स्वस्तात बाद झाले. यानंतर मधल्या फळीने डाव सावरल्यामुळे बांग्लादेशने भारताला सन्मानजनक आव्हान दिले. प्रत्युत्तर भारताने सलामीवीर शुभमन गिलच्या शतकामुळे बांग्लादेशवर निसटता विजय मिळवला. यासह भारताने या स्पर्धेत विजयी सुरुवात केली. (India narrow win over weak Bangladesh in ICC Champions Trophy)
नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांग्लादेशची सुरुवात खूपच खराब झाली. दुखापतीनंतर पुनरागमन करणाऱ्या मोहम्मद शमीने आज बांग्लादेशविरुद्ध दमदार प्रदर्शन केले. त्याने डावाच्या पहिल्याच षटकात बांग्लादेशचा सलामीवीर सौम्य सरकारला (0) बाद केले. यानंतर पुढच्याच षटकात हर्षित राणाने बांग्लादेशचा कर्णधार नजमुल हुसेन शांतो (0) बाद केले. त्यामुळे अवघ्या 27 धावांवर बांग्लादेशच्या 2 विकेट पडल्या होत्या. यानंतर सातव्या षटकात शमीने मेहदी हसन मिराज (5) ला बाद करून भारताला तिसरे यश मिळवून दिले. नव्या षटकात गोलंदाजी करण्यासाठी आलेल्या अक्षर पटेलने बांग्लादेशची अवस्था आणखी बिकट केली. त्याने क्रीजवर चांगलाच स्थिरावलेला तन्जीद हसन (25) षटकाच्या दुसऱ्याच चेंडूंवर बाद केले. यानंतर पुढच्या चेंडूवर त्याने मुशफिकुर रहीम (0) ला बाद केले. त्यामुळे 35 धावांवर बांग्लादेशच्या 5 विकेट पडल्या होत्या.
हेही वाचा – Mohammed Shami : ‘चॅम्पियन’ मोहम्मद शमी; बांगलादेशच्या 5 विकेट्स घेत मोडला वर्ल्ड रोकॉर्ड
A fighting century from Shubman Gill helps India begin their #ChampionsTrophy campaign with a win 👏#BANvIND 📝: https://t.co/YrDJCV7R6G pic.twitter.com/xzVJ0niQ0J
— ICC (@ICC) February 20, 2025
मुशफिकुर रहीमला बाद केल्यानंतर अक्षर पटेलसाठी हॅटट्रिकची संधी उपलब्ध झाली. परंतु भारताचा कर्णधार रोहित शर्माने एक सोपा झेल सोडला आणि याचा फटका पुढील काही क्षणात भारताला बसताना दिसला. झाकीर अली आणि तौहीद हृदयॉय सहाव्या विकेटसाठी 154 धावांची भागिदारी रचली. झाकीर अली 114 चेंडूंत 4 चौकारांच्या मदतीने केल्या 68 धावा करून बाद झाला. यानंतर भारताने पुन्हा एकदा बांग्लादेशवर दबाव बनवण्यास सुरुवात केली. रिशाद हुसेन (18) बाद झाल्यानंतर शेवटच्या फलंदाजांना धावा करता आल्या नाहीत. तौहिद हृदयॉयच्या रुपात बांग्लादेशला शेवटचा धक्का बसला. मात्र तोपर्यंत तौहिद हृदयॉयने 118 चेंडूंत 6 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने केल्या 100 धावा केल्या होत्या. त्यामुळे बांग्लादेशने सर्व बाद 228 धावा केल्या. भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक 5 विकेट घेतल्या. महत्त्वाचे म्हणजे शमीने या सामन्यात 200 विकेट्सचा टप्पा पार केला. शमीशिवाय हर्षित राणाला 3 आणि अक्षर पटेलला 2 विकेट मिळाल्या.
हेही वाचा – Rohit Sharma : सोप्पा कॅच पकडू शकला नाही रोहित शर्मा, एका चुकीने हुकली अक्षरची हॅटट्रिक, पाहा VIDEO
बांग्लादेशकडून मिळालेल्या आव्हानाचा पाठलाग करताना कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिलने भारताला चांगली सुरुवात करून दिली. परंतु रोहित शर्मा 36 चेंडूंत 7 चौकारांच्या मदतीने 41 धावा करून बाद झाला. 69 धावांवर भारताची पहिली विकेट पडली. यानंतर तिसऱ्या क्रमाकांवर आलेल्या विराट कोहलीने शुभमन गिलसोबत दुसऱ्या विकेटसाठी 43 धावांची भागिदारी केली. मात्र त्यानंतर बांग्लादेशने भारताला एकामागून एक धक्के दिले. विराट (22) श्रेयस (15) आणि अक्षर (8) धावा करून बाद झाले. भारताने 32 धावात आपल्या तीन विकेट गमावल्या. यानंतर विकेटकीपर फलंदाज केएल राहुलने गिलसोबत पाचव्या विकेटसाठी 87 धावांची नाबाद भागीदारी करत भारताला विजय मिळवून दिला. केएल राहुलने 47 चेंडूत एक चौकार आणि 2 षटकारांसह 41 धावा काढत नाबाद राहिला. तर शुभमन गिलने 129 चेंडूत 9 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 101 धावा केल्या. यासह भारताने या स्पर्धेत विजयी सुरुवात केली. बांग्लादेशकडून रिशाद हुसेनने सर्वाधिक 2, तर तस्किन अहमद आणि मुस्तफिजूर रहमानने प्रत्येकी एक विकेट मिळाली.