भारताविरुद्ध तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात इंग्लंडचे फलंदाज पुन्हा अपयशी ठरले. या कसोटीत इंग्लंडचा पहिला डाव अवघ्या ११२ धावांत आटोपला होता आणि याचे उत्तर देताना भारताने १४५ धावा करत ३३ धावांची आघाडी मिळवली होती. इंग्लंडचे फलंदाज दुसऱ्या डावातही अपयशी ठरले. त्यांनी डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेल आणि ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनपुढे नांगी टाकली. इंग्लंडचा दुसरा डाव केवळ ८१ धावांत आटोपला. त्यामुळे आता भारताला हा डे-नाईट कसोटी सामना जिंकण्यासाठी ४९ धावांचे आव्हान मिळाले आहे. इंग्लंडच्या दुसऱ्या डावात केवळ अष्टपैलू बेन स्टोक्सला वीस धावांचा टप्पा पार करता आला. त्याने २५ धावांची खेळी केली.
Axar Patel and R Ashwin run through England’s line-up to set India a target of 49 to win ✨#INDvENG ➡️ https://t.co/0unCGUOHmI pic.twitter.com/43pxZ9rz9C
— ICC (@ICC) February 25, 2021
अक्षरच्या सामन्यात ११ विकेट
इंग्लंडच्या दुसऱ्या डावात अक्षरने ३२ धावांत ५ विकेट आणि अश्विनने ४८ धावांत ४ विकेट घेतल्या. अक्षरने आपल्या घरच्या मैदानावर खेळताना या सामन्यात एकूण ११ गडी बाद केले. त्याला अश्विनने ७ विकेट घेत उत्तम साथ दिली. इंग्लंडच्या दुसऱ्या डावाची अडखळती सुरुवात झाली. पहिल्याच षटकात अक्षरने झॅक क्रॉली आणि जॉनी बेअरस्टो यांना खातेही न उघडता बाद केले. त्यानेच डॉम सिबली (७) आणि कर्णधार जो रूट (१९) यांनाही बाद केले. अश्विनने बेन स्टोक्स, ऑली पोप आणि जोफ्रा आर्चर यांना बाद करत कसोटी कारकिर्दीत ४०० विकेट पूर्ण केल्या. अखेर इंग्लंडचा दुसरा डाव ८१ धावांत आटोपला.