इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाला चांगले प्रदर्शन करता आले नाही. भारताच्या गोलंदाजांनी चांगले प्रदर्शन केले. पण भारताच्या फलंदाजांनी अतिशय खराब प्रदर्शन केले आहे. विराट कोहली वगळता एकही फलंदाजाला सातत्यपूर्ण प्रदर्शन करता आलेले नाही. ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक-फलंदाज ॲडम गिलख्रिस्ट याच्यामते जर भारताला परदेशात जिंकायचे असेल तर त्यांना मानसिकदृष्ट्या अधिक सक्षम बनण्याची आवश्यकता आहे.
भारताचे गोलंदाज अप्रतिम
गिलख्रिस्ट एका कार्यक्रमात भारतीय संघाविषयी म्हणाला, “परदेशात खेळणे हे नेहमीच एक आव्हान असते. भारताकडे अप्रतिम गोलंदाज आहेत. त्यांनी इंग्लंडमध्ये चांगले प्रदर्शन केले आहे. तर भारताकडे काही चांगले फलंदाजही आहेत. त्यातच भारताकडे विराट कोहलीच्या रूपात जगातील सर्वोत्तम फलंदाज आहे. असे असूनही भारत जिंकू शकत नाही याचे कारण भारतीय संघ मानसिक दृष्ट्या अजून पूर्णपणे सक्षम नाही. त्यांना जिंकण्यासाठी मानसिकतेत बदल करण्याची आवश्यकता आहे.”
भारत २०१९ विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहचू शकेल
इंग्लंडमध्ये होणाऱ्या २०१९ क्रिकेट विश्वचषकाबाबत गिलख्रिस्ट म्हणाला, “२०१९ विश्वचषकात इंग्लंड, भारत, पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया हे संघ उपांत्य फेरीत पोहचू शकतील. इंग्लंडकडे सध्या अतिशय आक्रमक खेळाडू आहेत. ते त्यांच्या घरच्या मैदानात खेळण्याचा त्यांना फायदा होईल. तर ऑस्ट्रेलियालाही चांगले प्रदर्शन करण्याची संधी आहे. तसेच भारताने इंग्लंडमध्ये चॅम्पिअन्स ट्रॉफी जिंकली होती. तर पाकिस्तान आपल्या दिवशी कोणालाही हरवू शकते.”