भारत आणि पाकिस्तान या देशांमधील राजकीय तणावामुळे या दोन देशांच्या क्रिकेट संघांमध्ये २०१२-१३ नंतर द्विपक्षीय मालिका झालेली नाही. हे दोन संघ केवळ आयसीसीच्या स्पर्धांमध्ये एकमेकांविरुद्ध खेळतात. मात्र, भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामने झाले पाहिजेत, असे पाकिस्तानच्या काही माजी क्रिकेटपटूंना वाटत आहे. परंतु, भारताचा माजी क्रिकेटपटू आणि खासदार गौतम गंभीरने या गोष्टीला विरोध दर्शवला आहे. पाकिस्तान इस्लामाबादहून जम्मू आणि काश्मीर येथे होणाऱ्या आतंकवादी कारवाया थांबवत नाही, तोपर्यंत भारताने पाकिस्तानसोबत क्रिकेट सामने खेळता कामा नये असे गंभीरला वाटते. ‘अखेर क्रिकेट महत्वाचे नाही. आपल्या सैनिकांचे जीव महत्वाचे आहेत,’ असे गंभीर म्हणाला.
सैनिक आपल्या देशाचे खरे हिरो
तसेच क्रिकेटपटूंना देशाचे प्रतिनिधित्व करताना क्रिकेटपटूंना बरेच पैसे मिळतात, पण सैनिक हे आर्थिक गोष्टींचा विचार न करता देशाचे रक्षण करत असतात, असेही गंभीरने नमूद केले. मी देशासाठी खेळून आणि देशाला सामने जिंकवून कोणाचेही भले केले नाही. परंतु, सियाचीन किंवा पाकिस्तानच्या सीमांवर देशाचे संरक्षण करणाऱ्या सैनिकांचा विचार करा. ते फार पैसे मिळत नसतानाही देशासाठी आपला जीव धोक्यात घालतात. ते आपल्या देशाचे खरे हिरो आहेत. त्यांचे आयुष्य कोणत्याही क्रिकेट सामन्यापेक्षा मोठे आहे, असे गंभीर म्हणाला. गंभीरला लहानपणी सैनिक व्हायचे होते. परंतु, क्रिकेटपटू म्हणून भारतासाठी केलेल्या कामगिरीचा त्याला अभिमान असल्याचे त्याने एका मुलाखतीत सांगितले.