IND vs AUS WC Final अहमदाबाद -नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीला उतरलेल्या टीम इंडियाची सुरुवात बरी झाली असली तरी नंतर अर्धी टीम झटपट बाद होत गेली. यामुळे भारतीय फलंदाजांवर दबाव निर्माण झाला तो शेवटपर्यंत कायम राहिला. केएल राहुल (66) आणि विराट कोहलीच्या अर्धशतकी (54) खेळीच्या जोरावर टीम इंडियाने निर्धारीत 50 षटकांत सर्वबाद 240 धावा केल्या. कर्णधार रोहित शर्माने त्याच्या पदाला शोभेल अशी फलंदाजी केली. त्याने 31 चेंडूत 47 धावा केल्या. तर सूर्यकुमार यादव 18 धावांवर बाद झाला. मोहम्मद सिराज 9 धावांवर नाबाद राहिला.
ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. मिचेल स्टार्कने 3 गडी बाद केले, तर पॅट कमिन्स आणि जोश हेजलवूडने प्रत्येकी 2 गड्यांना तंबूत पाठवले.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील एक दिवसीय वर्ल्डकप 2023 ( World Cup 2023) चा अंतिम सामना येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरु आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघ सलग दहा सामने जिंकून फायनलामध्ये दाखल झाला आहे. तर ऑस्ट्रेलियाने आठ सामन्यांमध्ये विजय संपादन केला आहे. टीम इंडियाने सेमीफायनलमध्ये न्यूझिलंडला पराभूत केले, तर ऑस्ट्रेलियाने साऊथ आफ्रिकेला मात दिली होती. भारताची नजर आता तिसरा विश्वचषक जिंकण्यावर आहे. टीम इंडियाने 1983 आणि 2011 मध्ये वर्ल्डकपवर नाव कोरले होते. ऑस्ट्रेलियाच्या नावावर आतापर्यंत पाच वर्ल्डकप आहेत.
ऑस्ट्रेलियासमोर 241 धावांचे आव्हान
भारताने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 241 धावांचे आव्हान ठेवले आहे. टीम इंडियाने निर्धारित 50 षटकांमध्ये सर्वबाद 240 धावा केल्या.
सूर्यकुमार यादवने क्रीजवर टिकून राहण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा संघर्ष जोश हेजलवूडने संपवला. सूर्याचा झेल विकेटकीपर जोश इंग्लिसने घेतला. त्याने 28 चेंडूत 18 धावा केल्या. तेव्हा टीम इंडियाची धावसंख्या 47.3 षटकात 226 धावांवर 9 गडी बाद अशी होती.
अॅडम जांपाने जसप्रीत बुमराला पायचीत केले. बुमराहने फक्त एक धाव काढली होती. तो मैदानात आला आणि गेला, असेच काहीसे घडले. तेव्हा भारताची धावसंख्या 44.5 षटकांत 8 गडी बाद 214 धावा होती. तेव्हा सूर्यकुमार यादव 14 धावांवर खेळत होता. जांपाची या वर्ल्डकपमधील 23वी विकेट ठरली. त्या बरोबरच त्याने मोहम्मद शामीच्या विकेट्सची बरोबरी केली.
शामीही आऊट
मोहम्मद शामीच्या रुपाने भारतीय संघाने सातवी विकेट गमावली. शामीचा झेल वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कच्या बॉलिंगवर विकेटकीपर जोशने टिपला.
केएल राहुलची अर्धशतकी खेळी
भारतीय संघाला मजबूत स्थितीत आणले ते केएल राहुलने. राहुलने 66 धावांची खेळी केली. त्याला मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर विकेटकीपर जोशने झेलबाद केले.
75 चेंडूनंतर पहिला चौकार
भारतीय फलंदाजांना कांगारुंच्या गोलंदाजांनी क्रीजवर जणू बांधून ठेवले अशी स्थिती होती. तब्बल 75 चेंडूनंतर सूर्यकुमार यादवने चौकार लगावला. 39 व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर त्याला हे यश मिळाले. तेव्हा टीम इंडियाची धावसंख्या 192 होती. याआधी 27 व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर भारतीय फलंदाजाने चेंडू सीमेपार केला होता.
जडेजा स्वस्तात बाद
रवींद्र जडेजा स्वस्तात बाद झाला. अवघ्या 9 धावांवर तो तंबूत परतला. त्याचा झेल विकेटकीपर जोशने हेजलवूडच्या गोलंदाजीवर टीपला. त्याआधीच्या चेंडूवर तो थोडक्यात बचावला होता. तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या टीमने डीआरएस घेतला होता, जो वाया गेला. तेव्हा भारताची धावसंख्या 35.5 षटकात पाच बाद 178 धावा होती.
केएल राहुलचे संथ अर्धशतक
केएल राहुलने अर्धशतकी खेळी केली. त्याने 86 चेंडूत एका चौकारासह हे यश मिळवले. 35 व्या षटकानंतर भारताची धावसंख्या चार बाद 173 धावा अशी होती. तेव्हा क्रीजवर राहुल 50 आणि जडेचा 9 धावांवर खेळत होता.
भारताला मोठा धक्का
विराटच्या रुपाने ऑस्ट्रेलियाला मोठे यश आणि भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. विराटने 63 चेंडूत 54 धावा झळकवल्या. यामध्ये चार चौकारांचा समावेश होता. कोहलीला पॅट कमिन्सने बोल्ड केले. तेव्हा टीम इंडिया 28.5 षटकांत चार गडी गमावत 148 धावांवर खेळत होती.
ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी टीम इंडियाचा तिसरा फलंदाज श्रेयस अय्यरला अवघ्या 4 धावांवर बाद केले. कर्णधार पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर जोश कडे झेल देत तो बाद झाला.
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा 47 धावांवर बाद झाला. ट्रॅव्हिस हेडच्या गोलंदाजीवर ग्लेन मॅक्सवेलने त्याला झेलबाद केले.
सलामीवीर शुभमन गिल श्रेयस प्रमाणेच चार धावांवर तंबूत परतला. त्याला मिचेल स्टार्कने अॅडमकरवी झेलबाद केले.
स्टार्कने गिलला या वर्ल्डकपमध्ये तिसऱ्यांदा बाद केले.