प्रतिस्पर्धी संघाने भारताच्या एकाही खेळाडूशी पंगा घेण्याचा प्रयत्न केला, तर आमचे सर्व खेळाडू मिळून त्याचे उत्तर देतील, असे म्हणत भारताचा सलामीवीर लोकेश राहुलने प्रतिस्पर्धी संघांना ताकीद दिली आहे. लॉर्ड्सवर झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारत आणि इंग्लंडच्या खेळाडूंमध्ये शाब्दिक चकमक झाल्याचे पाहायला मिळाले. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वूडने भारताच्या जसप्रीत बुमराहच्या हेल्मेटवर लक्ष्य करत सातत्याने बाऊंसर टाकले. त्यामुळे बुमराहची इंग्लंडचा कर्णधार जो रूट आणि जिमी अँडरसन यांच्याशी शाब्दिक चकमक झाली. तसेच इंग्लंडचा नवखा गोलंदाज ऑली रॉबिन्सनही भारतीय फलंदाजांना काही गोष्टी बोलताना दिसला. इंग्लंडच्या चौथ्या डावात भारताचा कर्णधार विराट कोहलीने या स्लेजचे प्रत्युत्तर दिले. तसेच भारताचे इतर खेळाडूही मागे राहिले नाहीत.
प्रत्युत्तर द्यायला घाबरत नाही
दोन्ही संघांना सामना जिंकायचा होता. कसोटी क्रिकेट हे अशाचप्रकारे खेळले जाते. आम्ही संघ म्हणून स्लेजचे प्रत्युत्तर द्यायला घाबरत नाही. प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूने भारताच्या एकाही खेळाडूला स्लेज करण्याचा प्रयत्न केला, तर आमचे सर्व खेळाडू मिळून त्याचे उत्तर देतील. आमच्या संघातील वातावरणच तसे आहे. आमचे एकमेकांशी खूप छान जुळते. तुम्ही आमच्या एका खेळाडूशी पंगा घेत असाल, तर तुम्ही आमच्या संपूर्ण संघाशी पंगा घेत आहात हे प्रतिस्पर्धी संघाने समजून घ्यावे, असे राहुल म्हणाला.
राहुलने पटकावला सामनावीराचा पुरस्कार
राहुलने इंग्लंडविरुद्ध पहिल्या दोन कसोटीत दमदार पुनरागमन केले आहे. राहुलला जवळपास दोन वर्षे कसोटी संघाच्या बाहेर बसावे लागले होते. परंतु, इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटीत त्याने अवघड परिस्थितीत अर्धशतक झळकावले. तर दुसऱ्या कसोटीत त्याने कामगिरीत आणखीच सुधारणा करत १२९ धावांची खेळी केली. हे त्याचे कसोटी कारकिर्दीतील सहावे शतक ठरले. या उत्कृष्ट खेळीमुळे त्याने सामनावीराचा पुरस्कार पटकावला.
हेही वाचा – लॉर्ड्सवरील विजयानंतर टीम इंडियाचे क्रिकेटविश्वातून कौतुक