भारतीय संघाला इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यात पराभव पत्करावा लागला. भारताने हा सामना एक डाव आणि ७६ धावांनी गमावला. इंग्लंडने या कसोटीतील विजयासह पाच सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी केली आहे. भारतीय संघाने या मालिकेची चांगली सुरुवात केली होती. पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिल्यानंतर दुसऱ्या कसोटीत विजय मिळवत भारताने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली होती. हेडिंग्ले येथे झालेल्या तिसऱ्या कसोटीत मात्र भारतीय संघाने निराशाजनक खेळ केला. भारताचा यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंत या सामन्याच्या दोन्ही डावांत (२ आणि १ धाव) स्वस्तात माघारी परतला. पंतला तीन सामन्यांत केवळ ८७ धावा करता आल्या आहेत. त्यामुळे त्याच्यावरील दबाव हळूहळू वाढत आहे. परंतु, भारताचा कर्णधार विराट कोहलीने पंतची पाठराखण केली आहे.
सातत्याने सामने गमावलेले नाहीत
एका पराभवानंतर कठोर निर्णय घेण्याची गरज नाही. तुम्ही केवळ एका सामन्यातील कामगिरीचा विचार करू शकत नाही. आम्ही संघ म्हणून सातत्याने सामने गमावलेले नाहीत. या सामन्यात आम्ही चांगला खेळ केला नाही आणि या पराभवाची आम्ही पूर्ण जबाबदारी घेतो, असे कोहली म्हणाला. पंतच्या धावा होत नसल्याने मधल्या आणि तळाच्या फलंदाजांवर दडपण येत असल्याचे मान्य करण्यास कोहलीने नकार दिला.
नैसर्गिक खेळ करण्याची मोकळीक
चेतेश्वर पुजाराच्या धावा होत नसल्याची मागील काही काळ चर्चा सुरु होती. परंतु, कालपासून या चर्चा थांबल्या आहेत. मी याआधीही म्हणालो आहे की, पंतला नैसर्गिक खेळ करण्याची आम्ही मोकळीक दिली आहे. आम्ही त्याच्यावर दडपण टाकणार नाही. परिस्थितीनुसार आणि जबाबदारीने खेळ करण्याची आम्ही सर्वच फलंदाजांकडून अपेक्षा करतो. आमचा पंतला पूर्ण पाठिंबा आहे, असे कोहलीने तिसऱ्या कसोटीनंतर सांगितले.
हेही वाचा – पहिल्या डावातील पडझड अनपेक्षित; पराभवानंतर कर्णधार कोहलीची कबुली