ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघ इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेची दमदार सुरुवात करण्यास सज्ज झाला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेला शुक्रवारपासून सुरुवात होत असून या मालिकेतील पहिला सामना चेन्नईच्या एम.ए.चिदंबरम स्टेडियममध्ये होणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताचा कर्णधार विराट कोहली वैयक्तिक कारणांमुळे केवळ एकच सामना खेळला होता. मात्र, इंग्लंड मालिकेत विराटचे संघात पुनरागमन होणार असून त्याच्यातील आणि इंग्लंडचा कर्णधार जो रूटमधील द्वंद्वाकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतात सर्व खेळ बंद होते आणि क्रिकेटही याला अपवाद ठरले नाही. परंतु, आता वर्षभरानंतर भारतात आंतरराष्ट्रीय क्रिकेटला पुन्हा सुरुवात होत आहे.
मालिकेचे महत्व अधिकच वाढले
भारत आणि इंग्लंड या बलाढ्य संघांमधील या कसोटी मालिकेतील सामने चुरशीचे होतील अशी अपेक्षा आहे. त्यातच आता ऑस्ट्रेलियाचा दक्षिण आफ्रिका दौरा रद्द झाल्याने भारत-इंग्लंड कसोटी मालिकेचे महत्व अधिकच वाढले आहे. या मालिकेच्या विजेत्या संघाला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्याची संधी आहे.
भारताचा संघ अधिक मजबूत
भारताने नुकतीच ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात पराभूत करण्याची कामगिरी केली. या मालिकेत भारताचे बरेचसे प्रमुख खेळाडू जायबंदी झाले. त्यांच्या अनुपस्थितीत नवख्या खेळाडूंना संधी मिळाली आणि त्यांनी संधीचे सोने केले. त्यामुळे भारतीय संघात प्रत्येक स्थानासाठी खूप स्पर्धा आहे. मात्र, विराट, ईशांत शर्मा यांसारख्या प्रमुख खेळाडूंच्या पुनरागमनामुळे भारताचा संघ अधिक मजबूत झाला असून या मालिकेत भारताचे पारडे जड मानले जात आहे.
सामन्याची वेळ : सकाळी ९.३० पासून; थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स नेटवर्क
हेही वाचा – भारताच्या ‘या’ फलंदाजाला लवकर बाद करणे इंग्लंडसाठी महत्वाचे