भारताचा फलंदाज चेतेश्वर पुजाराला मागील काही कसोटी सामन्यांत चांगली कामगिरी करता आलेली नाही. पुजाराने आतापर्यंतच्या कसोटी कारकिर्दीत १८ शतके केली आहे. यापैकी अखेरचे शतक हे ३१ डावांपूर्वी आले होते. पुजाराला मोठी खेळी करण्यात अपयश असतानाच त्याच्या धावांच्या गतीविषयीही बरीच चर्चा होते. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पुजाराला दोन डावांत मिळून केवळ २३ धावा (८ आणि १५) करता आल्या. त्याने या धावा करण्यासाठी १३४ चेंडू (५४ आणि ८०) खेळून काढले. त्याच्या या संथ फलंदाजीबाबत संघ व्यवस्थापन नाराज असल्याचे म्हटले जात होते. परंतु, आता कर्णधार विराट कोहलीने पुजाराची पाठराखण केली आहे. त्याच्याविषयी सतत चर्चा करणे आता बंद झाले पाहिजे, असे म्हणत कोहलीने टीकाकारांना सुनावले.
अनुभवी खेळाडूबाबत सतत चर्चा नको
पुजाराबाबत बऱ्याच काळापासून चर्चा सुरु आहे. तो उत्कृष्ट खेळाडू आहे आणि त्याच्याइतक्या अनुभवी खेळाडूबाबत सतत चर्चा करत राहणे योग्य नाही, असे कोहली म्हणाला. परंतु, त्याच वेळी पुजाराच्या कामगिरीत सुधारणा होऊ शकते असे संकेतही त्याने दिले. एखादा खेळाडू काय चुका करत आहे, हे त्याने स्वतःच समजून घेतले पाहिजे. हीच गोष्ट मलाही लागू पडते, असे कोहलीने सांगितले.
आमच्यावर परिणाम होत नाही
लोक काय बोलतात, याने पुजाराला काहीच फरक पडत नाही. लोक त्यांना हवे ते बोलू शकतात. ते केवळ शब्द असतात आणि या शब्दांचा आमच्यावर परिणाम होत नसल्याचेही कोहली म्हणाला. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला आजपासून (बुधवार) सुरुवात होत आहे. या मालिकेत धावा करण्यासाठी पुजारावर दडपण आहे. पुजाराला इंग्लंडमध्ये आतापर्यंत १० कसोटी सामन्यांच्या २० डावांत केवळ २७.५२ च्या सरासरीने ५२३ धावाच करता आल्या आहेत.