गेल्या काही वर्षांपासून फॉर्म हरवलेली टीम इंडिया सध्या हॉकीत चांगली कामगिरी करताना दिसत आहे. नुकत्याच बंगळुरूत पार पडलेल्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने न्यूझीलंडवर ३-० च्या फरकाने विजय मिळवला आहे. पहिले दोन सामने चांगल्या फरकाने जिंकल्यानंतर अखेरच्या सामन्यातही भारताने न्यूझीलंडला ४-० च्या फरकाने पराभूत करत मालिका खिशात घातली आहे.
सामन्यात सुरुवातीपासूनच भारताने आपला दबदबा ठेवला होता. भारताकडून पहिल्या सत्रातच रुपिंदरपाल सिंहने ८ व्या मिनिटाला गोल करत पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर सुरेंद्र कुमारने १५ व्या मिनिटाला आणखी एक गोल करत भारताला २-० ची आघाडी मिळवून दिली. यानंतर अखेरच्या सत्रात मनदीप सिंहने ४४ व्या तर आकाशदीप सिंहने ६० व्या मिनिटाला गोल करत भारताला सामना आणि मालिका जिंकवून दिली. भारताच्या भक्कम बचावफळीमुळे संपूर्ण सामन्यात न्यूझीलंडचा संघ एक देखील गोल करू शकला नाही.
The Indian Men’s Hockey Team earned another impressive 4-0 victory over New Zealand in their final encounter of the three-match series played out in Bengaluru. Here is the result of the match on 22nd July.#IndiaKaGame pic.twitter.com/kRsawE5bTN
— Hockey India (@TheHockeyIndia) July 22, 2018
आशियाई खेळांसाठी भारत सज्ज
इंडोनेशियातील जकार्ता आणि पालेबांग येथे १८ व्या आशियाई गेम्स पार पडणार आहेत. १८ ऑगस्ट ते २ सप्टेंबरदरम्यान ही स्पर्धा चालणार असून त्यासाठी भारताकडून ५२४ खेळाडूंचे पथक रवाना होणार आहे. या स्पर्धेत भारताची हॉकी टीम देखील खेळणार आहे. आशियाई खेळांसारख्या मोठ्या स्पर्धेत खेळण्याआधी भारताने न्यूझीलंडसारख्या तगड्या संघाविरूद्धची मालिका ३-० च्या फरकाने जिंकल्यामुळे भारत आशियाई खेळांसाठी सज्ज झाला असल्याचे दिसून येत आहे.