भारत आणि पाकिस्तान यांचा सामना आज (बुधवारी) रंगणार आहे. चॅम्पिअन्स ट्रॉफी २०१७ च्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारताचा पराभव केला होता. त्यामुळे भारत पाकिस्तानचा पराभव करण्यास उत्सुक असतील हे निश्चित.
कोहलीच्या अनुपस्थितीत इतरांवर अधिक जबाबदारी
भारताने कर्णधार विराट कोहलीला आशिया चषकासाठी विश्रांती दिली असल्याने या सामन्यात भारताच्या इतर फलंदाजांवर आपला खेळ उंचावण्याची जबाबदारी आहे. हाँग काँगविरुद्धच्या सामन्यात शिखर धवन आणि अंबाती रायडू यांनी चांगली फलंदाजी केली. पण पाकिस्तानच्या घातक गोलंदाजीसमोर इतर फलंदाजांनीही धावा करणे गरजेचे आहे. तर हाँग काँगविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्या आणि गोलंदाजीच्या एकदिवसीय क्रमवारीतील अव्वल स्थानी असणारा जसप्रीत बुमराह यांना विश्रांती देण्यात आली होती. पण पाकिस्तानविरुद्ध ते संघात येतील अशी अपेक्षा आहे. या दोघांच्या समावेशाने भारतीय संघाची ताकद अधिकच वाढेल हे निश्चित.
पाकिस्तानकडे घातक गोलंदाज
पाकिस्तान हा असा संघ आहे जो आपल्या दिवशी कोणत्याही संघाचा पराभव करू शकतो. पाकिस्तान पूर्वीपासूनच आपल्या गोलंदाजीसाठी ओळखला जातो. पाकिस्तानकडे मोहम्मद आमीर, शादाब खान आणि हसन अली असे अप्रतिम गोलंदाज आहेत. हसन अली सध्या एकदिवसीय क्रमवारी तिसऱ्या स्थानी आहे. तर पाकिस्तानच्या फलंदाजांनीही मागील काही काळात चांगले प्रदर्शन केले आहे. बाबर आझम, शोएब मलिक, फखर झमान आणि कर्णधार सर्फराज अहमद यांच्यावर पाकिस्तानच्या फलंदाजीची भिस्त आहे.
त्यामुळेच भारत आणि पाकिस्तान हा सामना नेहमीप्रमाणेच अटीतटीचा होईल अशी अपेक्षा आहे.