भारत आणि पाकिस्तानचा सामना पाहण्यासाठी नेहमीच क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण असते. भारत आणि पाकिस्तानच्या सामन्याला क्रिकेट युद्ध असेही बोलले जाते. त्यामुळे सर्व क्रिकेटप्रेमी सुरूवातीपासून अगदी शेवटच्या षटकापर्यंत या दोन संघातील सामना पाहतात. मात्र, आता भारत-पाकिस्तान सामन्याच्या चाहत्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. कारण तब्बल 2027पर्यंत भारत आणि पाकिस्तान कोणतीही मालिका खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाने 2023 ते 2027पर्यंतचा आपला कार्यक्रम जाहीर केला आहे.
भारतीय क्रिकेट बोर्डाच्या 2023 ते 2027पर्यंतच्या कार्यक्रमानुसार, भारतीय संघ पुढील पाच वर्षांत पाकिस्तानविरुद्ध कोणतीही द्विपक्षीय मालिका खेळणार नाही. बीसीसीआयने राज्य क्रिकेट बोर्डांना सांगितलेल्या भविष्यातील कार्यक्रमात पाकिस्तानचा कॉलम रिकामा ठेवण्यात आला आहे. (india will not play pakistan till 2027 in bilateral series match with australia and england every year)
2023 ते 2027 या पाच वर्षाच्या कालावधीत भारत आणि पाकिस्तान एकमेकांशी मालिका खेळणार नसले तरी, आयसीसी स्पर्धेत एकमेकांविरुद्ध खेळतील. पुढील वर्षी फक्त पाकिस्तान विश्वचषक खेळण्यासाठी भारतात येणार आहे. यानंतर 2025 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारतालाही पाकिस्तानला जावे लागणार आहे.
भारतीय संघ आयसीसी किंवा एसीसी टूर्नामेंट खेळण्याव्यतिरिक्त 38 कसोटी सामने खेळणार आहे. यामध्ये 20 कसोटी भारतात, 18 परदेशात खेळल्या जाणार आहेत. या पाच वर्षांत भारत 42 एकदिवसीय सामनेही खेळणार आहे. यातील 21 सामने घरच्या मैदानावर तर 21 सामने बाहेर खेळवले जाणार आहेत.
भारत 2023-2027दरम्यान एकूण 61 टी-20 सामने खेळणार आहे. 31 टी-20 घरच्या मैदानावर आणि 30 बाहेर खेळले जातील. दरम्यान, भारत सरकारच्या परवानगीशिवाय बीसीसीआय पाकिस्तानसोबतच्या मालिकेबाबत कोणताही निर्णय घेऊ शकत नाही.
हेही वाचा – ‘महाराष्ट्राला शिवसेना व ठाकरेंशिवाय पर्याय नाही’; ऋतुजा लटकेंचा शिंदे गट-भाजपाला टोला